विशेष प्रतिनिधी
पुणे: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या भ्रामक विचारांमुळे देशात अराजक निर्माण करण्याचा कट करणाऱ्या शक्तींना बळ मिळत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ( Anarchists get strength due to Rahul Gandhi’s delusional views’, comments Devendra Fadnavis)
‘जयपूर डायलॉग’च्या डेक्कन समिट कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि जयपूर डायलॉगचे प्रमुख संजय दीक्षित यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर कडवी टीका केली.
राहुल गांधी यांनी आपल्या पराभवाच्या कारणांचा शोध घेतला तरच त्यांचा पक्ष टिकून राहू शकेल. मात्र, ते केवळ बहाणेच शोधत राहिले तर आगामी काळात काँग्रेसची अवस्था आणखी बिकट झाल्याशिवाय राहणार नाही, असे फडणवीस यांनी सुनावले. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांमध्ये तब्बल एक कोटी मतांचा फरक असल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यासह काल संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींबाबत सविस्तर आकडेवारी देऊन तीन महत्त्वाचे प्रश्न निवडणूक आयोगाला केले होते. यावर
फडणवीस म्हणाले, राहुल गांधी हे सतत भ्रमात राहणारे नेते आहेत. जनतेने त्यांची साथ सोडली आहे याची जाणीवही त्यांना होत नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासारख्यांना बरोबर घेऊन त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या तर त्यांचे विचारही तसेच राहणार. मात्र या भ्रामक विचारांमुळे राजकतावाद्यांना बळ मिळत आहे. देशातील संवैधानिक यंत्रणाबाबत अपप्रचार करून त्यांच्याबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा 180 अराजकतावादी संघटनांचा कट आहे. राहुल गांधी यांच्या भ्रामक विधानांमुळे त्यांना बळ मिळते आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपची लढाई या अराजकतावादी संघटनांशी होती. त्यांनीच भाजपबद्दल अनेक ‘फेक नरेटिव्ह’ मतदारांमध्ये पसरवली. त्याला तोडीस तोड उत्तर देण्यात आम्ही कमी पडलो. विधानसभा निवडणुकीत मात्र अशा अपप्रचाराला सडेतोड उत्तर देण्याची यंत्रणा संघ परिवारातच असल्याचे लक्षात घेऊन आम्ही संघ परिवारातील विविध संस्था संघटनांच्या सहकार्याने उत्तम कामगिरी करू शकलो, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्यांवर नाराजी व्यक्त करताना फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना चांगलेच सुनावले. सर्जनशीलता राहिलेली नाही. माहितीच्या मुळाशी जाण्याची, खात्री करून घेण्याची, शोध घेण्याची, नवनवीन विषयांना भिडण्याची वृत्ती आणि गांभीर्य माध्यमांमध्ये राहिले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या सतत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या केवळ करमणूक करणाऱ्या आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाहीत. एकनाथ शिंदे हे धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाचे नेते आहेत. त्यांची तशीच छायाचित्र प्रसिद्ध करून त्यांच्या नाराजीच्या बातम्या पसरविल्या गेल्या,
भाजप आणि शिवसेना युती अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदावरून संपुष्टात आल्याचा संपूर्ण वृत्तांत देखील फडणवीस यांनी सविस्तर कथन केला. वास्तविक तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि तत्कालीन शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात निवडणुकीपूर्वीच साटेलोटे झाले असल्याचा दावा त्यांनी केला.