विशेष प्रतिनिधी
सांगली: पोलीस बरोबर काम करत नाही. दलितांवर अत्याचार झाला की लवकर आरोपी पकडला जात नाही असा आरोप करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की दलितांच्या वर अन्याय झाला तर आरोपी लवकर पकडावे, अशी मागणी केंद्रीय समाज कल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली. ( Ramdas Athawale accused the police of not arresting the accused when Dalits are oppressed)
सांगली येथे पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले,
सरकार असताना दलितांच्यावर अन्याय होत असतील तर बरोबर नाही. या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. यात विशेष लक्ष द्यावे असे सांगणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुतीने एकत्र निवडणूक लढवाव्यात. आम्हाला ही 3 ते 4 जागा द्याव्या. पंचायत समितीच्या निवडणुकीत 6 ते 7 जागा मिळाव्यात आमचा आंदोलनातुन आलेला पक्ष आहे. आमची पॅालिटिकल ईमेज अजून म्हणावी तशी मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला जागा मिळाव्यात अशी मागणी असल्याचे आठवले म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. यावर ते म्हणाले, शिर्डीला जाण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा माझा निर्णय चुकीचा होता. शिर्डी मध्ये हरलो कारण मुळात मी चुकलो. मात्र मी हरलो आणि मोदींच्या बरोबर गेलो आणि मंत्री झालो. मी जिंकलो असतो तर मोदींच्या कडे गेलो नसतो.
लव्ह जिहाद कायद्याला आपला विरोध असल्याचे सांगताना रामदास आठवले म्हणाले, मुस्लिम समाजाला कठोर विरोध करणे या भूमिकेला माझा विरोध आहे. मुस्लिम मुलाने हिंदू मुलीशी लग्न केल्यावर मुलीला मुस्लिम बनवू नये. मुलीला मुस्लिम करण्याची भूमिका अयोग्य आहे. मात्र असा कायदा होऊ नये. मुस्लिम आपलाच आहे. सबका साथ, सबका विकास हा नरेन्द्र मोदी यांचा नारा आहे.