विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील वेगवेगळ्या भागात बांग्लादेशी रोहिग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा उघडकीस येत आहे. या घुसखोरांची पाळेमुळे सिल्लोडपर्यंत पोहोचली आहेत. माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी सिल्लोड येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
( Birth certificate scam for Bangladeshi Rohingyas in Sillod, Kirit Somaiya’s allegation)
सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी खान यांनी सिल्लोड येथे जन्म झाल्याचा एकही पुरावा नसलेल्या ४०६ लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिलेत. यातील बरेच लोक हे ३० ते ६५ वर्षे वयोगटातील असून बांग्लादेशी मुस्लिम ही त्यांची पार्श्वभूमी आहे. त्यांनी आपल्या अर्जाबरोबर पुरावा म्हणून केवळ आधार कार्ड जोडले आहे. याव्यतिरिक्त भारतात जन्म झाल्याचे एकही कागदपत्र त्यांनी दिलेले नाही. अशा ४०६ जणांना सिल्लोडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी जन्म प्रमाणपत्र दिले आहेत.
सिल्लोड येथे २०२४ मध्ये जन्म प्रमाणपत्र मिळवण्याकरिता ४ हजार ८५५ अर्ज आले असून यातील एकही अर्ज फेटाळण्यात आला नाही. यातील ३ हजार अर्ज संशयास्पद असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्याची हकालपट्टी करून सिल्लोड येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्याची विनंती किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
नोव्हेंबर २०२३ पासून जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आला. तेव्हापासून आतापर्यंत राज्यात दोन लाख २३ हजार नागरिकांना जन्म प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी, रोहिंगे अथवा पाकिस्तानी नागरिकांना जन्माचे दाखले दिले गेल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात उपविभागीय अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी तहसीलदारांची तक्रार घ्यावी, त्यांनी न दिल्यास त्यांच्यासह संबंधित अधिकारी व खोटे जन्म प्रमाणपः मिळविणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.