विशेष प्रतिनिधी
शिर्डी : हिंदू-मुस्लिम मुले-मुली एकत्र आले, की त्यास लव्ह जिहाद म्हणणे योग्य नाही, असे सांगत
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी लव्ह जिहाद विरोधी कायद्याला विरोध केला आहे.
( Ramdas Athawale’s clear stand against the ‘Love Jihad’ law)
शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, लव्ह जिहाद’ कायद्याला माझा विरोध आहे. हिंदू-मुस्लिम मुले-मुली एकत्र आले, की त्यास असे म्हणणे योग्य नाही. दलित-सवर्णसुद्धा एकत्र येतात. मुले-मुली एकत्र येतात, अशी लग्न होतात. हिंदू- मुस्लिम लग्न झाले, की त्याला ‘लव्ह जिहाद’ म्हणणे चुकीचे आहे. मी याला सहमत नाही. परंतु धर्मांतर होऊ नये म्हणून कायद्यात तरतूद असावी,.
‘जातीय सलोखा न बिघडवता योग्य भूमिका असावी. मोदी सर्वांना समान मानतात. त्यांनी सर्वांसाठी योजना आणल्या. त्याचा मुस्लिम समाजालाही फायदा होतो. मोदी सरकार अतिरेकी मुस्लिमांच्या विरोधात आहे. मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत. मुलाने हिंदू धर्म स्वीकारावा अशीही तरतूद असावी. मी यातून गेलोय. मुले, मुली एकत्र आले आणि सहमतीने लग्न झाले, तर त्यात वावग काय, असा सवाल त्यांनी केला.
आगामी पालिका निवडणुकीबाबत ते म्हणाले, आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत जागा मिळतील. जागा दिल्या नाही, तर स्वतंत्र लढण्याची आमची तयारी आहे. लोकसभा आणि विधानसभेला आम्हाला जागा मिळाल्या नाहीत. पण महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला जागा मिळतील. महाराष्ट्रात आम्हाला न्याय मिळत नाही. मंत्रिपदाची अपेक्षा होती. किमान महामंडळे तरी मिळावीत, अशी अपेक्षा होती
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत आठवले म्हणाले, ‘आंधळे नावाचा आरोपी अद्यापही फरार आहे. पोलिसांनी एवढा वेळ लावता कामा नये. कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. परभणी घटनेतही पोलिसांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. तो हृदयविकाराने गेला अशा अफवा पसरविण्यात आली. यामध्ये जे पोलीस दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली आहे. आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेण्याची आवश्यकता नव्हती.