विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रावर संकट आले अशी जोरदार टीका काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केली आहे.
दलवाई म्हणाले, मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्विकारलं ही शिवसेनेची सर्वात मोठी चूक आहे. शिवसेनेनं हिंदुत्व स्वीकारलं आणि RSS ला मदत केली. शिवसेनेच्या त्या चुकीमुळे मुंबईचं गुजरातीकरण होतं आहे. शिवसेनेनं मराठीचा मुद्दा आता पुन्हा हातात घ्यावा. शिवसेनेच्या चुकीच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रावर हे संकट आलं आहे, मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतोय.
शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा सुरुवातीला शिवसेनेकडून महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा मुद्दा उचलून धरण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेनं आपली भूमिका बदलत हिंदूत्वाचा मुद्दा हाती घेतला. याच एका मुद्द्यावर भाजपसोबत युती केली. त्यानंतर राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेत देखील आली. त्यानंतर सत्तेत असतानाच भाजप आणि शिवसेनेमध्ये देखील खटके उडाले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले. भाजपला सत्तेच्या बाहेर बसावं लागलं. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि युतीचं सरकार सत्तेत आलं. शिवसेनेत मोठी फूट पडली, शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट असे दोन गट पडले. आता हुसेन दलवाई यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा मराठी लोकांचा मुद्दा हाती घेण्याचा सल्ला दिला आहे.