विशेष प्रतिनिधी
जालना : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.( मुखमंत्री उलट्या काळजाचा दिसतो असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर विखारी टीका केली आहे.)
मनोज जरांगे यांनी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू आहे. जरांगे म्हणाले, आम्हाला पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येईल असं वाटत नव्हतं. आमच्या एकाही बांधवांचा जीव जायला नको पण मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करणार आहात की नाही. सगळे मेल्यावर सांगू नका दहा दिवसांनी सांगितल्यापेक्षा आजच सांगून टाका. तोंड लपवू नका. संध्याकाळपर्यत सांगून टाका, म्हणजे उपोषण सोडून देऊन दुसरा मार्ग स्वीकारता येईल, तुम्ही मराठ्यांना सुखाने खाऊ दिल नाही तर तुम्हाला 5 वर्ष सुखाने खाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला, संध्याकाळपर्यत सांगून टाका, अंमलबजावणी करायची की नाही सांगून टाका. तोंड लपवू नका.
फडणवीस यांना एकच म्हणणं आहे की,आमच्या मागण्या पूर्ण होईल की नाही ते सांगावं अन्यथा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल, असे ते म्हणाले. आपल्या म्हणण्याचा दुसरा कोणताही उद्देश नाही, आपला उद्देश फक्त मागण्या पूर्ण होण्याचा आहे. मुख्यमंत्र्यांनी मागण्या पूर्ण होईल की नाही हे सांगावं. मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी मागे पुढे सरकू शकतो पण स्वार्थासाठी नाही, यातच जातीच कल्याण आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईल की नाही ते मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगावं, असे आवाहन त्यांनी केले.