विशेष प्रतिनिधी
पुणे : महापालिका निवडणुकी संदर्भात केव्हाही निकाल येईल. निकाल आला की निवडणुकीला सामोरे जाऊ. आमची तयारी पूर्ण झाली आहे. सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्रित लढणार असल्याचे महसूल मंत्री भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना काही ठिकाणी भाजप स्वबळावर लढू शकते असे संकेत बावनकुळे यांनी दिले होते. यावरून राजकीय चर्चाही सुरू झाली होती. शिंदे गटानेही त्यावर स्वबळाची तयारी असल्याचे उत्तर दिले होते. मात्र आज पुण्यात बोलताना बावनकुळे यांनी महायुती म्हणून सर्व निवडणुका एकत्रित लढणार असल्याचे स्पष्ट केले. महायुती सर्व नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती निवडणुका जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आम्ही महायुती म्हणून लढलो. काही ठिकाणी सिटची अदलाबदल करावी लागली. पण आम्ही एकसंघ राहिलो, लढलो आणि राज्य जिंकले असेही ते म्हणाले.
महापालिका निवडणुकांबाबत बावनकुळे मिळाले, सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण विषय आहे. कोर्टाने जे काही मागितलं होतं ते सगळं सरकारने दिलं आहे. निवडणूक आयोगाला कोर्ट लवकरच योग्य सूचना देईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात आम्ही सगळी तयारी करत आहोत 13 हजार जागांवर वर निवडणूक व्हाव्यात ही आमची इच्छा आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात जे काही म्हणणं होतं ते आमच्या वकिलांनी मांडला आहे. आता केव्हाही निकाल येईल आणि निकाल आला की निवडणुकीला सामोरे जाऊ. आमची तयारी पूर्ण झाली आहे.
भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाबाबत बावनकुळे म्हणाले, राज्यात 1 कोटी 51 लाख सदस्य जोडणीच अभियान सुरू केला आहे आज पुण्यात कार्यशाळा पार पडली. आज 12 हजार पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सदस्य नोंदणी पूर्ण करणार आहे. आज 1 कोटी 16 लाख मेंबर आहेत. राज्यात पुन्हा एकदा घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. कार्यकर्ते घरोघरी जाणार आहेत . 3 लाख कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह मेंबरशिप देणार आहे.
लाडकी बहीण योजना तसेच इतर योजनांवर कुणीही काहीही संभ्रम तयार करत आहे असा आरोप करत बावनकुळे म्हणाले, कुठलीही योजना बंद होणार नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सगळ्या योजनांना वेगळे बजेट दिले आहे. शिवभोजन योजना देखील बंद होणार नाही. राज्यातील कुठलीच योजना बंद होणार नाही सगळ्या योजना सुरू राहतील. हे सरकार योजना बंद करणारे नाही तर योजना वाढवणारे आहे असे सांगताना ज्यांना गरज नाही त्यांनी योजना घेऊ नये विनंती बावनकुळे यांनी केली.
भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवर मी याबाबत पूर्णपणे स्पष्ट केलं आहे. आता बोलणार नाही, असे त्यांनी सांगितले. मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस ठरवेल, असे बावनकुळे म्हणाले.