विशेष प्रतिनिधी
पुणे : महिलांसाठी केवळ कायदे करून काही होणार नाही. अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हायला हवी असे मत माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले. ( Laws alone are not enough for women, they should be properly implemented, appeals former Chief Justice Chandrachud)
स्वारगेट बलात्कार प्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर पुण्यातील एका कार्यक्रमात चंद्रचूड म्हणाले,
महिलांवरील अत्याचार रोखायचे असतील तर केवळ कायदे बनवून काही होणार नाही तर त्यांची योग्य अंमलबजावणी देखील गरजेची आहे. निर्भया प्रकरणानंतर कायद्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले.
दिल्लीतील 23 वर्षीय फिजिओथेअरपीच्या विद्यार्थिनीवर अमानुष पद्धतीने बलात्कार झाला होता. या प्रकरणाचा संदर्भ देत चंद्रचूड म्हणाले की, केवळ कायद्यांची व्यवस्था करून काहीही होणार नाही. तर समाज म्हणून समाजाची देखील मोठी जबाबदारी आहे. याशिवाय महिलांसाठी करण्यात आलेल्या कायद्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. ज्यामुळे महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल. आज मोठ्या प्रमाणात महिला नोकरी, अभ्यास आणि अन्य कामांसाठी घराबाहेर पडतात. त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, ही आपली जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.
कोणत्याही गुन्ह्याचा योग्य तपास, योग्य चौकशी, कठोर कारवाई, तात्काळ सुनावणी आणि कठोर शिक्षा देण्यात आली पाहिजे. त्यामुळेच अशा प्रकरणात कायदा व्यवस्था आणि पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. या प्रकरणांची मोठ्या गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ज्यामुळे महिला सुरक्षित वातावरणात काम करू शकतील. समानतेवर आधारित समाजाचा हाच पाया असल्याचेही चंद्रचूड म्हणाले.