विशेष प्रतिनिधी
मुंबई: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना निमंत्रण दिले आहे. यावरून पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त करताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ( Eknath Shinde was going to join Congress, Sanjay Raut reveals)
भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्रीपद मिळणार नाही. त्यामुळे एकदा शिंदे आणि अजित पवार यांनी काँग्रेसकडे यावे. दोघांना आलटून-पालटून मुख्यमंत्रीपद देऊ, अशी ऑफर नाना पटोले यांनी दिली आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे तेव्हा कॉंग्रेसकडे चालले होते. पृथ्वीराज चव्हाणांना विचारा. अहमद पटेल आता नाहीत. पण दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती त्यांची. हे सर्वात जास्त मला माहित आहे.
नाना पटोले यांच्या ऑफरवर मी काय बोलू शकतो वाचा गेली अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना राऊत म्हणाले, नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत. राजकारणात काहीही अशक्य नसते. मविआ सरकार येईल असे कोणाला वाटले होते का? राजकारणाच सर्व शक्यता आहे. त्यांनी कुणाला ऑफर दिली आहे व कुणी मान्य केली आहे का हे त्यांच्याशी चर्चा करून बघू. राजकारणात रुसवे फुगवे, आदळ आपट सुरू आहे. नानांनी लवकर भांडे वाजवले. थोडे थांबायला हवे होते.
एकनाथ शिंदेंचा भगव्याशी काही संबंध नाही. भाजपच्या ताटाखालचे मांजर झाली आहे. त्यांच्या हाती भाजपचा झेंडा आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हातात भाजपचा झेंडा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याशी त्यांचा काही संबंध नाही. तो उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे, असेही राऊत म्हणाले.
जयंत पाटील यांच्या नाराजी विषयी राऊत म्हणाले,
जयंत पाटील मविआचे नेते आहेत. पवारांचे विश्वासु आहेत. काहीही अफवा पसरवू नका अन्यथा कायद्याने कारवाई होईल.
शेतकरी आत्महत्या प्रश्नावर राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, हे सरकार ढोंगी आणि दुतोंडी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर,आत्महत्येवर तोंड उघडत नाही. बुलढाण्यातील कैलास या शेतकऱ्याला कृषी क्षेत्रातील पुरस्कार मिळाला होता. कृषी मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी आत्महत्या केलीय. केवळ कैलासची आत्महत्या नाही तर सर्व शेतकऱ्यांची आहे. आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करावा याचा खुलासा मुख्यमंत्री यांनी करावा. सरकार काहीच करत नाही हे सरकार निक्कमे आहे. हे सरकार खोक्या बोक्याच्या मागे लागले आहे पण शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार? मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची माफी मागायला हवी
निवडणुकी पूर्वी मतासांठी दिलेली ती वचने होती. महिलांसाठी १५०० रूपयांचे दुकान लावले होते. कर्ज माफी तर नाही. आता शिवभोजनपासून आनंदाच्या शिधापर्यंत सर्व बंद करातायत. सरकार मग कशासाठी चालवत आहे? काल घराघरात आक्रोश असताना रंग उधळत होते. एकमेकांना रंग फासत आहे
राज ठाकरे यांच्या लाडकी बहीण लाच वक्तव्यावर राऊत म्हणाले, आम्हीही म्हटले होते की ती लाच आहे. हे करप्शन आहे. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दारात जावून आंदोलन करावे. ते भाजपसोबत आहेत. सर्वजण एकत्र आले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मांडली. त्यांनी एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांना जाब विचारला पाहिजे