विशेष प्रतिनिधी
मुंबई : आम्ही विधानसभा निवडणुकीला समोर गेलो तेव्हा संकल्प केला होता. त्यामध्ये आम्ही पाच वर्षांत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे सांगितले होते. त्या संकल्पामध्ये ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या, त्या गोष्टी पाच वर्षांत पूर्ण करू. आमचे सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. (We will waive farmersloans in five years says Chandrasekhar Bawankule )
बावनकुळे म्हणाले, जेव्हा आम्ही पुढील निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा, आमच्या संकल्पपत्रामधील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही. जो वचननामा आम्ही जनतेला मते घेताना दिला तो नक्कीच पूर्ण करू.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगड दौऱ्यावर येणार आहेत. तेव्हा ते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी जाणार आहेत. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, आमच्या अमित शाह यांनी महायुतीतील एका पक्षाच्या अध्यक्षाला वेळ दिला आहे. हे आमचे संस्कार आहे. अमित शाह तटकरेंच्या घरी जात असतील, तर गोगावले, एकनाथ शिंदे आणि आम्ही नाराज होण्याच कारण नाही. सुनील तटकरे यांनी महायुतीच्या सर्वच पक्षाच्या लोकांना निमंत्रण दिले आहे. एकनाथ शिंदेंना निमंत्रण दिले आहे, गोगावलेंना निमंत्रण दिल आहे. आम्हालाही निमंत्रण आहे. या भेटीचा राजकीय अर्थ कोणी काढू नये, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.