विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानने शुक्रवारी रात्री भारतातील 26 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या भारतीय लष्कराने हा प्रयत्न उधळून तर लावलाच, त्याचबरोबर पाकिस्तानी हवाई तळांवर जोरदार हल्ले केले. भारतीय सैन्याने जम्मूजवळील पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त केले. येथून ड्रोन डागले जात होते.
( Heavy attacks by India on Pakistani airbases
पाकिस्तानने शुक्रवारी, सलग दुसऱ्या रात्री, जम्मू-काश्मीरपासून गुजरातपर्यंत 26 ठिकाणी ड्रोन हल्ले केले होते. विमानतळ तसेच हवाई दलाच्या तळांसह महत्त्वाच्या प्रतिष्ठानांना पाकिस्तानने लक्ष्य केले होते, पण त्यांचे हे हल्ल्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले, अशी माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. मात्र, रात्रीच्या अंधारात केलेल्या हल्ल्यात पंजाबमधील फिरोजपूर येथील एका कुटुंबातील काही सदस्य जखमी झाले. पाकिस्तानच्या हल्ल्यांमध्ये जखमी होण्याची ही एकमेव घटना आहे. सीमेलगतच्या सर्व राज्यांमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.
मात्र, पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या तीन हवाई दलाच्या तळांवर हल्ले करण्यात आले. भारताने नूर खान (रावळपिंडी), मुरीद (चकवाल) आणि रफीकी (झांग जिल्हा, पंजाब) या तीन पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य करून क्षेपणास्त्रे डागली. परंतु, पाकिस्तानी हवाई दलाचे कोणतेही नुकसान झाले नाही, असे पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी सांगितले. तर दुसरीकडे, पाकिस्तान नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने देशाचे हवाई क्षेत्र पहाटे 3.15 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या उड्डाणांसाठी बंद ठेवण्याची घोषणा केली.
शनिवारी सकाळी पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि गुजरातवर पुन्हा हल्ला केला. राजौरी, पूंछ आणि जम्मूमध्येही जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात राजौरीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह 5 जण ठार झाले.
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या श्री गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात रेड अलर्ट आहे. चंदीगड आणि अंबाला येथे हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाकिस्तानचा दावा आहे की, त्यांनी आदमपूर, उधमपूर, पठाणकोट, सुरतगड आणि सिरसा हवाई तळांवरही हल्ला केला. याशिवाय राजौरी येथील लष्करी प्रशिक्षण केंद्र, पंजाबमधील बियास येथील ब्रह्मोस साठवण सुविधा देखील लक्ष्य करण्यात आली. तथापि, भारताने याची पुष्टी केलेली नाही.