विशेष प्रतिनिधी
मुंबई : पहलगामचा माणुसकीला काळीमा फासणारा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या काळात भारताने पाकिस्तानचा जगासमोर आणलेला दहशतवादाचा चेहरा हा कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा मोठा विजय आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.( The Prime Minister tore the veil of terrorism Eknath Shinde praised him)
ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने जागतिक स्तरावर दहशतवाद आणि पाकचा चेहरा उघड करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरचाच एक भाग म्हणून भारताची दहशतवादविरोधी ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका अधिक प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळे वेगवेगळ्या राष्ट्रांना पाठवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून अभिनंदन करतो. हे भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. या शिष्टमंडळांमध्ये देशातल्या सर्व राजकीय पक्षांचा देखील समावेश केल्यामुळे दहशतवाद विरोधात देशाची एकजूट आहे हे चित्र दिसेल.
संपूर्ण जगाला दहशतवादाची गंभीर समस्या आहे. याच्या विरोधात ठामपणे उभं राहण्यासाठी अशा रितीने उचललेलं हे पाऊल जगभरात भारताची प्रतिमा एक जबाबदार, शांतताप्रिय आणि दहशतवाद विरोधात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्र म्हणून उजळेल असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला
भारताचे हे शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य देश आणि इतर प्रमुख देशांचा या महिन्याच्या अखेरीस दौरा करेल. या शिष्टमंडळात काँग्रेसचे शशी थरूर, भाजपाचे रविशंकर प्रसाद, जनता दलाचे संजय कुमार झा, भाजपाचे बैजयंत पांडा, डीएमकेचे कनीमोई करुणानिधी, शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे, शिंदेसेनेकडून श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. माहितीनुसार, हे शिष्टमंडळ अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार आणि संयुक्त अरब अमीरातसारख्या देशांचा दौरा करतील.