विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील पिंपरी येथील वैष्णवी कस्पटे-हगवणे हिच्या दुर्दैवी हुंडाबळी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असतानाच, या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘हुंडामुक्त महाराष्ट्र – हिंसामुक्त कुटुंब’ या राज्यव्यापी मोहिमेची घोषणा केली आहे. येत्या २२ जून २०२५ पासून पुण्यातून या मोहिमेची सुरुवात होणार असून वर्षभर विविध टप्प्यांत राज्यभर ही मोहीम राबवली जाणार आहे.
( Statewide campaign for dowry-free Maharashtra from June 22)
सुळे यांनी म्हटले की, “वैष्णवीचा मृत्यू केवळ एक दुर्दैवी घटना नाही, तर ती आपल्या समाजातील असंवेदनशीलतेचे आणि स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रतीक बनली आहे. महाराष्ट्राला प्रगतीशील विचारांची परंपरा लाभलेली असतानाही, आजही हुंडा आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांनी आपले भान हरवते, हे दु:खद आहे. आता केवळ संताप व्यक्त करून भागणार नाही, तर कृतीशील भूमिका घेणे काळाची गरज आहे.”
सुळे म्हणाल्या, २२ जून १९९४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या देशातील पहिल्या महिला धोरणाची आठवण करून दिली. या धोरणामुळे राज्यातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे बदल झाले. मात्र आजही काही अनिष्ट प्रथांचा पगडा कायम आहे.
“शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा असणे ही लाजिरवाणी बाब आहे. जिजाऊ, सावित्रीमाई, अहिल्यादेवी यांच्यासारख्या तेजस्वी महिलांच्या महाराष्ट्रात असे प्रकार थांबायला हवेत,” असे सांगत सुळे यांनी समाजातील सर्व घटकांना या लढ्यात सामील होण्याचे आवाहन केले.
या मोहिमेद्वारे केवळ जनजागृतीच नव्हे, तर प्रत्येक स्तरावर कार्यवाही, संवाद, शिक्षण आणि धोरणात्मक बदल घडवून आणायचा आहे. हा लढा फक्त महिलांचा नाही, तर आपल्या सगळ्यांचाच आहे. मी माझ्या सर्व भावा-बहिणींना आवाहन करते की, आपण सर्वजण एकत्र येऊन ‘हुंडामुक्त महाराष्ट्र, हिंसामुक्त कुटुंब’ घडविण्यासाठी एकदिलाने काम करूया. वैष्णवीसाठी हीच खरी श्रद्धांजली ठरेल,” असे सुळे यांनी स्पष्ट केले.
या मोहिमेला सामाजिक संस्था, महिला संघटना, शैक्षणिक संस्था, युवक वर्ग आणि प्रशासन यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.