विशेष प्रतिनिधी
मुंबई : जोपर्यंत एखाद्या पक्षाची ताकद नसते तोपर्यंत त्या पक्षाला कोणीही विचारत नाही. आज मित्र पक्ष तुम्हाला सोबत घेईल हे विसरून जा. तुमची ताकद असेल तरच मित्र पक्षही तुम्हाला विचारेल. त्यामुळे तुम्हाला मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढावीच लागेल. तुम्हाला तुमची ताकद निर्माण करावीच लागेल, असा मंत्र माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी दिला आहे. .
राष्ट्रवादी अजित पवार गटाची महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानेमाटुंग्यात आज बैठक होती. बैठकीला नवाब मलिक, आमदार सना मलिक आणि सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते. यावेळी नवाब मलिक यांनी स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी केली. ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर या मुंबईत आपण कधीच 14 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू शकलो नाही. एकसंघ असतानाही आपण कधीच जास्त नगरसेवक निवडून आणले नाहीत. आता पक्षाचे दोन भाग झाल्यावर कार्यकर्त्यांच्या मनात चिंता आहे. कार्यकर्ते संभ्रमित आहेत. महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचं की महायुतीत लढायचं हा संभ्रम आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
नवीन लोकं जोडल्याशिवाय पक्ष वाढत नाही. तुम्हाला वाटत असेल भाजपसोबत जायचं आहे, पण भाजप कायमस्वरूपी आपल्यासोबत राहील असं वाटत असेल तर हा विचार सोडून द्या. राजकारणात कोणीही कुणासोबत परमनंट राहत नाही. जो ताकदवान असतो त्याला लोकं विचारतात. ताकद नसेल तर तुम्हाला कुणी विचारणार नाही. उद्या चालते व्हा म्हणून सांगू शकतील, पण आपली ताकद असेल तर आपण स्वबळावर या मुंबईत वेगळा ठसा निर्माण करू शकतो. 14 पेक्षा जास्त नगरसेवक आले नाही, हा आपल्यावरचा ठपका आहे. आपण व्यवस्थित लढलो आणि प्रत्येक बुथवर 100 मतांची ताकद निर्माण केली तर आपण जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू शकतो. आपल्यावरचा ठपका आपण पुसून टाकू शकतो, असे मलिक म्हणाले.