विशेष प्रतिनिधी
नाशिक : दोन मंत्र्यांची राजीनामे घेता आले असते. मात्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव होता, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. ( Lack of coordination in Mahavikas AghadiShashikant Shinde admits)
नाशिक शहराच्या दौऱ्यादरम्यान शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जर आघाडीतील पक्ष आणि नेते एकसंध राहिले असते, तर अधिवेशनात सरकारला अधिक अडचणीत आणता आले असते. आम्हाला दोन मंत्र्यांचे राजीनामे सहज घेता आले असते, पण आमच्याच घटक पक्षांमध्ये एकी दिसली नाही, त्यामुळे ते टळले, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. सध्याच्या महायुती सरकारला ‘मस्ती’ आल्याचा आरोप करत, सरकारमधील मंत्र्यांच्या विधानांमुळे रोज त्यांच्या कारभाराची लक्तरे बाहेर पडत आहेत.
शशिकांत शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीत एकवाक्यता असती तर, दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असता, अशी कबुली देत आमची चूक झाली असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले. आमच्या ताकदीला विभाजित करून ज्या पद्धतीने राज्यात सत्ता आली, त्याविरोधात आम्ही जर एकत्रितपणे आंदोलन केले तर सरकारला अडचणीत आणू शकतो,
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लवकरच एक मोठा मोर्चा काढण्यात येईल, असे सांगून शशिकांत शिंदे म्हणाले की, हे सरकार उद्योगपतींना हवे ते देण्याच्या भूमिकेत आहे आणि त्यांच्या माध्यमातून मुंबई गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहे. या सरकारला सामान्य जनतेच्या आणि मराठी माणसांच्या प्रश्नांची कोणतीही फिकीर नाही.