विशेष प्रतिनिधी
मुंबई : अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट सुरूच आहे. सोमवारी विमान धावपट्टीवरून घसरल्याने घबराट निर्माण झाली होती. मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली आहे.
( Air India plane skids off runwaymajor accident averted at Mumbai airport)
गेल्या महिन्यात अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात 275 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर एअर इंडियाच्या अनेक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अशातच आता मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान घसरले.
केरळमधील कोचीहून मुंबईला येणारे AI2744 विमान मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर लँडिंग दरम्यान धावपट्टीवरून घसरले, असे एअर इंडियाने म्हटले आहे. या दुर्घटनेत कोणत्याही प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना दुखापत झाली नाही. सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. विमान चौकशीसाठी थांबवण्यात आले असून प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे विमान कंपनीने सांगितले आहे.टेस्ला कार शोरूम
सीएसएमआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, आज सकाळी 09:27 वाजता कोचीहून येणारे एअर इंडियाचे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) धावपट्टीवरून घसरले. यानंतर सीएसएमआयएच्या आपत्कालीन प्रतिसाद पथकांना तत्काळ सक्रिय करण्यात आले. या दुर्घटनेत सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र विमानतळाच्या मुख्य धावपट्टी 09/27 ला किरकोळ नुकसान झाले आहे. त्यामुळे विमानसेवा सुरू राहावी यासाठी दुसरी धावपट्टी 14/32 सक्रिय करण्यात आल्याची माहिती दिली आहे.