विशेष प्रतिनिधी
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनी ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेवर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, “तुमच्या मुलालाही निवडून आणता आलं नाही, आणि तुम्ही आम्हाला बोलता? (Even you could not be able to elected son and talk to us? Ajit Pawar attacked Raj Thackeray)
वरळी येथे मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला होता. जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार गटाला 42 जागा मिळाल्या, असे ते म्हणाले होते. यावरून राज ठाकरे यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले, तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही, आणि तुम्ही काय आम्हाला बोलता, लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत नाही बसलो .
महाराष्ट्रातील निकालावरून राहुल गांधींकडून सुरू असलेल्या टीकेवरही अजित पवारांनी टोला लगावला. ते म्हणाले, “राहुल गांधींनी स्वतःची चौकशी टीम तयार करावी, ८ तारखेला दिल्लीचा निकाल आहे म्हणून आता रडगाणं सुरू आहे.”
शिवभोजन थाळी बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या असताना अजित पवारांनी स्पष्ट केलं की, “अजून अर्थसंकल्पही मांडला नाही, त्यामुळे अशा बातम्या कपोलकल्पित आहेत.”
पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत. ते म्हणाले, रिंग रोडसाठी दहा वेगवेगळे टेंडर काढले आहेत, आणि काम पूर्ण होताच उद्घाटन केले जाईल. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मोठा निर्णय घेतल्याची घोषणाही त्यांनी केली. “पीएमपीएलसाठी ५०० बसेस पीएमआरडीएच्या निधीतून आणि आणखी ५०० बसेस पुणे-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निधीतून घेणार आहोत, एकूण १००० नवीन बसेस लवकरच पीएमपीएलच्या ताफ्यात दाखल होतील.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत बोलताना गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक पावले उचलली जात असल्याचे सांगत पवार म्हणाले, “मुख्यमंत्री आणि मी स्वतः यावर लक्ष ठेवतोय. जर गुन्हेगारी वाढत असेल, तर तातडीने कठोर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पोलीस आयुक्तांना स्पष्ट आदेश दिले आहेत.”
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मागचे पैसे भरावे लागणार असल्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना पवार म्हणाले, “लाडक्या बहिणीकडून मागील रक्कम घेतली जाणार नाही, मात्र एकाच योजनेचा लाभ घेता येईल. लाडक्या बहिणीकडून मागचे पैसे घेतले जाणार नाहीत. मागच्यावेळी आम्हाला तपासणी करता आली नाही. कुठल्यातरी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानांवर मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारी आल्या आहेत. त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.”
कृषी विभागातील कथित गैरव्यवहारांवरून होत असलेल्या आरोपांवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, “दमानिया आणि मुंडे या दोघांनी आपली बाजू मांडली आहे. पुरावे आढळल्याशिवाय कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही. शहानिशा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल.