विशेष प्रतिनिधी
जळगाव : जळगाव रेल्वे अपघातात आतापर्यंत 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दखल घेण्यात आली असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे..दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.
जळगावातील पाचोरा येथे काही प्रवाशांना बंगळूरू एक्स्प्रेसने उडवल्याची माहिती समोर आली आहे. परांडा रेल्वे स्थानकांच्या आधी काही कारणास्तव पुष्पक रेल्वे थांबली होती. याचवेळी एसी कोचच्या प्रवाशांमध्ये आग लागल्याची बातमी पसरली. ज्यानंतर भीतीने काही प्रवाशांनी पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या घेतल्या. पण याचवेळी समोरील रेल्वे ट्र्रॅकवरून जाणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने त्या प्रवाशांना धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात आतापर्यंत 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दखल घेण्यात आली असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे.
अमित शहा यांनी ट्वीट करताना म्हटले की, महाराष्ट्रातील जळगाव येथे घडलेला रेल्वे अपघात अत्यंत दुःखद आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली आहे. स्थानिक प्रशासन जखमींना शक्य ती सर्व मदत पोहोचवत आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.अमित शहा यांच्याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत दुर्घटनेवर भाष्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावरून एक व्हिडीओ ट्वीट करताना म्हटले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक अतिशय भीषण अशा प्रकारची दुर्घटना घडली आहे. ज्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही देणार आहोत. तसेच जे जखमी आहेत, त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येतील. याशिवाय त्यांच्या नातेवाईकांना सर्व गोष्टी नीट मिळाव्यात याकरिता सर्वप्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहचून सर्व प्रकारच्या गोष्टी हाताळत आहेत.