क्वेटा : पाकिस्तानवर अनेक आघाड्यांवर तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) मोठा दावा केला आहे. त्यांच्या लढवय्यांनी क्वेटा शहरावर ताबा मिळवला असून, पाकिस्तानच्या लष्कराला बलुचिस्तानमधून पळवून लावल्याचे जाहीर करण्यात आले आहे. (Balochistan Liberation Army launches major attackclaims to have driven out Pakistan forces taken control of Quetta)
ही कारवाई भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या दरम्यान घडली आहे. एका बाजूला पाकिस्तानने भारताच्या सीमेवर तणाव निर्माण केला असताना, दुसऱ्या बाजूला त्याच्या पश्चिमी सीमेवर बलुच लढवय्यांनी कारवाया वाढवल्या आहेत. BLA च्या लढवय्यांनी क्वेटामधील फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयावर हल्ला चढवला असून, त्यानंतर शहरातील अनेक भागांवर नियंत्रण मिळवल्याचा दावा त्यांनी केला आहे.
क्वेटामधील कंबरानी रोडवरील ‘कॅप्टन सफर खान’ तपासणी नाक्यावर दोन स्फोट झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय, हजारा टाऊनमधील किरानी रोडवरील पोस्टवरही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळीबार आणि स्फोट घडवून आणले.
BLA ने एका निवेदनात सांगितले की त्यांनी केच, मस्तुंग आणि कच्छी या भागांमध्ये एकाच वेळी सहा हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये रिमोट-कंट्रोल IED (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव डिव्हाइस) आणि थेट सशस्त्र कारवाया यांचा समावेश होता.या हल्ल्यांचा उद्देश पाकिस्तानी लष्कराच्या तळांवर, त्यांच्या पुरवठा मार्गांवर आणि संवाद प्रणालींवर आघात करणे होता.
काल सकाळी ९ वाजता, जमरानच्या दस्तक भागात रस्ता साफ करत असलेल्या पाकिस्तानच्या बॉम्ब निकामी पथकावर IED ने हल्ला करण्यात आला. या स्फोटात एक जवान जागीच ठार झाला. आज जमरानच्या कटगन भागातील चेकपोस्टवर BLA च्या लढवय्यांनी स्वयंचलित शस्त्रांनी हल्ला केला, ज्यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे काही जवान ठार व जखमी झाले.
BLA ने साह डिम भागात पाक लष्कराच्या तळाकडे निघालेल्या पुरवठा ट्रकवर IED स्फोट घडवून आणला, ज्यामुळे संपूर्ण ट्रक उद्ध्वस्त झाला. यानंतर, पाकिस्तानी लष्कराने स्थानिक लोकांच्या मदतीने पुरवठा चालू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र BLA ने स्थानिकांना इशारा दिला आहे की, जर त्यांनी पाक लष्कराला कुठलीही मदत केली, तर त्यांना जबाबदार धरले जाईल.
आज, मस्तुंगच्या छोटू भागात बलुच लढवय्यांनी पाकिस्तानच्या संसाधनांची लूट करणाऱ्या वाहनांवर हल्ला चढवून त्यांना मोठे नुकसान केले. तसेच कच्छीच्या हाजी शहर भागात युफोन कंपनीच्या कम्युनिकेशन टॉवरवर हल्ला करून उपकरणे उद्ध्वस्त करण्यात आली.
BLA च्या प्रवक्त्या जियंद बलोच यांनी या सर्व हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारत म्हटले की, “पाकिस्तानच्या आक्रमक फौजांवर आमच्या लढवय्यांनी नियोजित पद्धतीने हल्ले केले आहेत. आमचा लढा बलुच स्वातंत्र्यासाठी चालूच राहील.”