विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज माझं नाव सी.पी.राधाकृष्णनन नसतं, वेगळं काहीतरी असते अशा शब्दांत महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी महाराजांचा गौरव केला.
कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाप्रसंगी सी.पी.राधाकृष्णन यांनी विविध विषयांवर भाष्य करत पदवी ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्वाचं मार्गदर्शन केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगताना ते म्हणाले, शिवरायांच्या शौर्यामुळे आपण सर्वजण आहोत. ते फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे राजे होते. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार आणि आदर्श घेऊन मार्गक्रमण केलं पाहिजे.
सी.पी.राधाकृष्णन म्हणाले “छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले. त्यांनी अनेक परदेशी आक्रमणाच्या विरोधात लढा दिला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे राजे नव्हे तर देशाचे राजे होते. आज त्यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठातील दिक्षांत समारंभात मला सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. तसेच शिक्षकांचे आणि पालकांचे देखील अभिनंदन करतो.
“खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा विद्यापीठाच्या परिसरात आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची आणि त्यांच्या जीवनाची आठवण हा पुतळा करून देतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वेल्लोर, तंजावर, सेनजी आणि तामिळनाडूमधील काही ठिकाणी भेट दिली होती हे ऐकून देखील समाधान वाटतं”, अशा भावना सी.पी.राधाकृष्णन यांनी व्यक्त केल्या.