विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पेटारे-बिटारे असे काहीच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले होते, असे वादग्रस्त वक्तव्यअभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केले आहे. यावरून त्यांच्यावर टिकेचा भडीमार होऊ लागला असून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले होते, त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या, याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावेही इतिहासात आहेत. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण आणि पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र, हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की, थोडे रंग भरून सांगावा लागतो. पण, रंजकता आली की, इतिहासाला छेद दिला जातो, असे राहुल सोलापुरकर यांनी मुलाखतीत म्हटले होते.
सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राहुल सोलापुरकर ह्याने आपण टकलु “हैवान” असल्याच सिद्ध केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेले वादग्रस्त विधान आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणुन कधीच खपवून घेतली जाणार नाही, अशी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातुन स्वकर्तुत्वावर निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला असताना जाणीवपूर्वक राहुल सोलापुरकर याने छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याची एक चाल खेळली आहे. याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी सभागृहात करेल, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय, अशी टीका राहूल सोलापूरकर यांच्यावर करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेन्द्र आव्हाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल. हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख?
असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.