विशेष प्रतिनिधी
शिर्डी : बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेली स्व.संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक होती. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवले पाहिजे, हे माझे पहिल्या दिवसापासून स्पष्ट मत आहे. गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती आहे, त्याला जात धर्म नसतो. मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे. सातत्याने आमची मीडिया ट्रायल केली जात आहे, अशी खंत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली .
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित नव संकल्प शिबिराच्या व्यासपीठावरून बोलताना प्रथमच सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले, मी वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच जास्त वाईट वाटत आहे. पक्षातील काही लोक देखील दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. मात्र तरीही माझी भूमिका व वस्तुस्थितीची जाणीव असल्याने या कठीण काळातही पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे आहेत. आज कुणी निराधार व बिनबुडाचे कितीही आरोप करून मला अडकवण्याचा, माझा अभिमन्यु करण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाही, कारण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे! अजित दादांनी आता बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे, याचा आनंदच आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारानंतर झालेल्या मीडिया ट्रायल, सोशल मीडियावरील चिखलफेक, साधलेले राजकारण अशा अनेक गोष्टींनी जिल्ह्याचे सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे. आपला पक्ष शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे, त्यामुळे आता आमच्या बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारी सुद्धा सर्वांना घ्यावी लागेल. ऊसतोड करून, कष्ट करून, कोरडवाहू शेती करून जगणारे आम्ही सामान्य लोक आहोत. आमचा जिल्हा बिहार आणि आमची परळी तालिबान नाही. अशीच बदनामी सुरू राहिली तर पुढच्या महिन्यात महाशिवरात्री आहे, बारा ज्योति्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ यांच्या दर्शनाला भाविक येतील का, अशी भीती वाटत असल्याचे सांगून परळीची बदनामी थांबवा असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
मी सतत काम करणारा एक कार्यकर्ता आहे, नेता फक्त नावाला आहे. माझ्यातला कार्यकर्ता कधीच मरणार नाही. मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे, पक्ष नेतृत्वाने पाँडिचेरी मध्ये जाऊन पक्ष विस्ताराचे काम कर म्हंटले तर तिथे जाऊन मी काम करेल. पक्षाला सुद्धा कार्यकर्ताभिमुख व्हावे लागेल. कार्यकर्त्याला ताकत देताना संपूर्ण विश्वास देखील ठेवणे आवश्यक आहे, तेव्हाच पक्ष संघटना मजबूत होईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यकर्ता कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी चांगले काम करून दाखवले. गाव – वस्त्यांची जाती वाचक नावे बदलणे, ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ यांसारखे अनेक क्रांतिकारी निर्णय त्याकाळात घेतले.११ हजार कोटी रुपये पीकविमा एका वर्षात मिळवून देणारा कृषिमंत्री मी, मात्र त्यावरूनही टीका झाली. मात्र अर्धवट माहिती देऊन बदनामी करणारे लोक यावर बोलत नाहीत, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.