विशेष प्रतिनिधी
मुंबई : गद्दार उपमुख्यमंत्र्यांसारखे ( एकनाथ शिंदे ) एवढे एहसान फरामोश, नमकहराम आणि अशी निर्लज्ज व्यक्ती मी पाहिलेली नाहीत. एकनाथ शिंदे यांचा चेहा कुणालाही माहिती नसताना उद्धव ठाकरे यांनी वरती आणलं. आमदारकी, मंत्रिपद, नगरविकास खाते दिले. मग ह्यांनी आमचं सरकार पाडलं. एवढं सगळं करून तुम्हाला कणभर सुद्धा लाज नाही, अशी शिव्यांची लाखोली आमदार आदित्य ठाकरे यांनी वाहिली.
( Ehsaan Faramosh Namakharaam shameless Aditya Thackerays allegations on Eknath Shinde!)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. याला विधिमंडळ परिसरात बोलताना प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. आम्ही विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर सरकारकडून पाहिजे. आम्हाला जनतेला उत्तर देणे भाग पडते. धारावीत जगातील सर्वात मोठा जमीन घोटाळा, बेस्ट संपत चालली आहे, शिक्षणाची वाट लागली आहे. आरोग्य खात्याचे वाटोळे केले. हे सगळे मुद्दे मी २९३ च्या भाषणातून मांडले आहे. पण, नगरविकास खात्याचे मंत्री फक्त, ‘म्हणून, म्हणून, म्हणून…’ एवढंच बोलतात. हे कुणी ऐकलंच नाही. कारण, एवढं घाणेरडं भाषण आणि रटाळपणा ऐकण्यासाठी मी आलो नाही.”
“एकनाथ शिंदे यांचा चेहरा कुणालाही माहिती नसताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना वरती आणलं. आमदारकी, मंत्रीपद, नगरविकास खाते दिले. नगरविकास किंवा समृद्धी महामार्गात घोटाळा केल्यानं ईडी मागे लागली आणि एकनाथ शिंदे यांना सुरतला पळून जावे लागले असा आरोप करून आदित्य ठाकरे म्हणाले, ह्यांनी आमचे सरकार पाडलं. उद्धव ठाकरे किंवा आमच्या पक्षावर आरोप करताना थोडीतरी लाज बाळगा. नगरविकास खाते तुमच्याकडे होते निर्लज्ज माणसांनो. एवढं सगळं करून तुम्हाला कणभर सुद्धा लाज नाही. तुमच्या आई-वडिलांचे तुमच्यावर काय संस्कार असतील. उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला घडवलं आणि तिकीटे दिली मंत्रीपदं दिली…त्यांच्यावर तुम्ही बोलता.. हे थोडेतरी भान ठेवून करावे…समोर आले तर झुकतात. डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाहीत.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत बोलताना मिठी नदी गाळ काढण्याच्या प्रकरणातील गैरव्यवहारावरून ठाकरे पितापुत्रांना इशारा दिला होता. या प्रकरणातील संशयित आणि आदित्य ठाकरेंचा मित्र दिनो मारिओ याने तोंड उघडले तर कोणाचा तरी मोरया होईल असा इशारा देत काचेच्या घरात राहणाऱ्यांची दुसऱ्याला दगड मारू नयेत असे सुनावले होते.