विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे, मोदींवर टीका करून चर्चेत राहता येते, त्यामुळे ‘बाप तो बाप होता है’ असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना लगावला आहे.
( Eknath Shinde slams Nana Patole for his shameless attempt to stay in the news by mentioning the Prime Minister once in a while)
भाजप नेते बबनराव लोणीकर तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा मुद्दा नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी मोदी तुमचे बाप असतील, शेतकऱ्यांचे नाही, असे वक्तव्य केले होते. थेट अध्यक्षाच्या डायसवर चढून राजदंडापुढे जाऊन लोणीकर प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागण्याची मागणी केली.
यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाना पटोले हे स्वत: विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांना सर्व कामकाजाची माहिती आहे. विधानसभेच्या सभागृहाचे पावित्र्य राखले पाहिजे, हे देखील त्यांना माहीत आहे. पण ते आज एवढे आक्रमक का झाले ते माहीत नाही. नाना पटोलेंकडून या कृतीची अपेक्षा नव्हती, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांची काँग्रेसमध्ये दिल्लीत चर्चा दिसत नव्हती. म्हणून आपल्या नावाची चर्चा झाली पाहिजे, पुन्हा प्रकाशझोतात यायला पाहिजे, यासाठी त्यांचा प्रयत्न होता का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
एकनाथ शिंदे म्हणाले, “विधानसभेत जनतेनी त्यांना दिले झटके, काँग्रेस सोळा पे लटके या अवस्थेत आहेत. आजच्या घटनेतून नाना पटोलेंनी काहीतरी बोध घेतला पाहिजे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करणे, हे देखील नियमाला आणि आपल्या परंपरेला धरून नाहीये. त्यामुळे पंतप्रधानांचा आदर केला पाहिजे. काँग्रेसचे राहुल गांधी देशाच्या बाहेर जाऊन देशाची, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी करतात.
मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून ५ जुलै रोजी सरकारने हिंदी सक्तीच्या निर्णयाचे दोन्ही जीआर रद्द केल्यामुळे विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला विजयी मेळाव्याला येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता, त्यांनी यावर बोलणे टाळले.