मुंबई : आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असं उध्दव ठाकरे म्हणाले. पण स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते. लढून जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद असावी लागते. घरात बसून लढता येत नाही असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना ठाकरे गट पक्उषप्रमुख द्धव ठाकरेंना लगावला आहे
तुम लढो, हम कपड़ा संभालता है, असं बोलून निवडणुका जिंकता येत नाही. कार्यकर्त्यांची मनंही जिंकता येत नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर रस्त्यावर उतरून, फिल्डवर येऊन काम कराव लागतं. त्याच्या सुखदु:खात समरस व्हावं लागते, असेही ते म्हणाले.
काल अंधेरीत पार पडलेल्या मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे एकट्याच्या बळावर निवडणुका लढण्याचे संकेत दिले आहेत. महापालिकेमध्ये एकट लढा असं पदाधिकाऱ्यांचं मत असल्याचंही ठाकरे म्हणाले. योग्य वेळी निर्णय घेऊन अमित शाहांना ताकद दाखवणार असल्याचा इशाराही दिला. मात्र त्यांच्या या विधानानंतर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मात्र टीकास्त्र सोडलं आहे.
निवडणुका लागल्या नाहीत, मात्र जर तुमची तयारी पूर्ण झाली तर आपण नक्कीच कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय घेऊ, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली. काही दिवसातच महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील. मी सगळ्यांशी बोलत आहे, मुंबईसह नाशिक, नगर सगळ्यांशी बोलून झाले आहे. सगळ्यांचं मत एकटं लढा असं आहे. पण, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. आधी तुमची जिद्द आणि तयारी बघू द्या. ज्यादिवशी तुमची तयारी झाली ही खात्री पटेल. त्या दिवशी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. वेळ येईल तेव्हा एकटा लढल्याशिवाय राहणार नाही. अमित शाहांना सांगतो जास्त नादी लागू नका. जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला जाल”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.