विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर ,: महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण रद्द करण्यासाठी महाविकास आघाडीचे काही लोक कोर्टात गेले, असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
( Eknath Shinde’s allegation, Mahavikas Aghadi went to court against Maratha reservation)
शिंदे म्हणाले, महायुतीच्या काळात आम्ही मराठा समाजासाठी अनेक योजना सुरु केल्या. कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. आम्ही दिलेले आरक्षण महाविकास आघाडी टिकवू शकली नाही हे त्यांचे दुर्दैव आहे. त्यामुळे आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहेत. त्यांच्या योजना कायम सुरु राहतील. आम्ही दिलेले १० टक्के आरक्षण रद्द करण्यासाठी महाविकास आघाडीचे काही लोक कोर्टात गेले हे दुर्देव आहे.
विरोधकांना जेव्हा विजय मिळतो तेव्हा ईव्हीएम, निवडणूक आयोग, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टही सगळे चांगले असते. पण जेव्हा ते पराभूत होतात तेव्हा ईव्हीएममध्ये आणि याद्यांमध्ये दोष आणि निवडणूक आयोगावर आणि आमच्यावर आरोप करतात. त्यांना दुसरा काहीच धंदा उरलेला नाही. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे आमदारसुद्धा ते मिळवू शकले नाहीत. यावरून महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. जनतेने जमीनीवर काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व शिलेदारांना विजयी केले आणि घरी बसणाऱ्यांना कायमचे घरी बसवले, असा टोला शिंदे यांनी लगावला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही या यशामध्ये गेमचेंजर ठरली असून काहीही झाले तरी ही योजना बंद होणार नाही. या योजनेसाठी पात्र असलेल्या बहिणींना यातून वगळणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी सांगितले.