विशेष प्रतिनिधी
मुंबई : तुम्ही भाजपाला धोका देऊन दुसरीकडे गेलात. आता शरद पवार आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत. अशा धोका देणाऱ्या पक्षावर आम्ही विश्वास ठेवायचा असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे. ( Frod with BJPSharad Pawar Ready to leave Congress how can we trust you direct question from Sandeep Deshpande)
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरेबंधू एकत्र यावे अशी चर्चा नेहमी होते. या विषयावर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच दिवशी सकारात्मक मत व्यक्त केलं. त्यामुळे पुन्हा एकदा ही चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरेंकडून तो प्रस्ताव आला तर आम्ही तो नाकारणार नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली होती. पण,या विषयावर मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी जुना इतिहास सांगत तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना संदीप देशपांडे म्हणाले की, त्यावेळी श्रीधर पाटणकर मला भेटले. त्यांनी मला सांगितलं की, दोन्ही भावांना आपण एकत्र आणलं पाहिजे. दोन्ही भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्र हिताच्या आणि सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत, असा त्यांनी एक प्रस्ताव ठेवला. त्यांनी राज ठाकरे यांच्याशी मी चर्चा केली. आम्ही श्रीधर पाटणकरांना सांगितलं की, या गोष्टीवर चर्चा होऊ शकते. त्यानंतर युती होऊ शकते की नाही, ते आपण ठरवू. त्याप्रमाणे आमची भेट झाली. त्यानंतर आमच्या पक्षाच्या वतीने संतोष धुरी हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले. तेव्हा उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की, आमचं आता भाजपासोबत लग्न आहे, ते लग्न आधी मोडू दे. त्यानंतर आपण साखरपुडा करू. मग कोण किती जागा लढवेल, हा विषय होईल.
त्याप्रमाणे 26 जानेवारीला उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबतची युती मोडली. त्यानंतर श्रीधर पाटणकर आणि उद्धव ठाकरे यांनी आमचे फोन उचलणे बंद केले. त्याआधी 2014 मध्ये उद्धव ठाकरे आणि भाजपाची युती तुटली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क केला आणि दोघांमध्ये ठरलं की, आपण निवडणूक एकत्र लढवूया. आमच्याकडून बाळा नांदगावकर आणि शिवसेनेकडून अनिल देसाई चर्चा करतील, असं ठरलं होतं. त्यासाठी राज ठाकरे यांनी एबी फॉर्म थांबवून ठेवले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि अनिल देसाई हे दोन दिवस फोन उचलत नव्हते. अनिल देसाई यांनी शेवटपर्यंत एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली, पण आम्ही मनसेचे एबी फॉर्म थांबवून ठेवले होते, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.
शिवसेनेने 2014 आणि 2017 ला आम्हाला धोका दिला असा आरोप करत देशपांडे म्हणाले, आज संजय राऊत आणि उद्धव ठाकरे म्हणत आहेत, जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, त्यांच्यासोबत राज ठाकरे जेवतात. पण 2019 पर्यंत राज ठाकरे तुमचे शत्रू नव्हते. परंतु त्याआधी नोटबंदी झाली किंवा भाजपाचे जे काही निर्णय झाले, ते महाराष्ट्र हिताचे नव्हते. त्या निर्णयांना विरोध करणारे त्यावेळी राज ठाकरे होते. पण त्यावेळेला भाजपा शिवसेनेसोबत चांगला होता. कारण भाजपाने 50-50 टक्के सत्तेचा वाटा देण्याचं कबूल केलं होतं. त्यानंतर 2019 लाही दोघांनी एकत्र निवडणुका लढवल्या. तोपर्यंत भाजपा चांगला होता. 2019 नंतर त्यांच्यात काय झालं, मला माहित नाही. पण 2019 नंतर भाजपा पक्ष महाराष्ट्राद्रोही कसा झाला? भाजपाची भूमिका काय आहे, हे शिवसेनेला 2019 आधी माहित नव्हतं का? उद्धव ठाकरे 2017 मध्ये एका भाषणात म्हणाले की, भाजपासोबत गेली 25 वर्षे युतीत आम्ही सडलो. पण त्याच भाजपासोबत त्यांनी 2019 ला लोकसभेत आणि विधानसभेत युती केली.
संदीप देशपांडे म्हणाले की, ज्या पक्षाबरोबर शिवसेनेने 2019 मध्ये युती केली, त्यांच्यासोबत युती तोडून ते शरद पवार आणि काँग्रेसच्या नादी लागले. त्यांच्यासोबत त्यांनी आघाडी स्थापन केली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. माझा एक सरळ सोपा आणि एक मार्काचा प्रश्न आहे. जर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना मिळालं असतं, तर आज त्यांच्या लेखी भाजपा पक्ष महाराष्ट्रद्रोही असता का? याच उत्तर उद्धव ठाकरे यांनी पहिलं दिलं पाहिजे. तुम्ही आतापर्यंत आम्हाला धोका देत आला आहात. यानंतर 2014 मधील विधानसभा निवडणूक आणि 2017 मधील महापालिका निवडणुकीचा इतिहास सांगितला. या दोन्ही निवडणुकीत मनसे आणि शिवसेना युतीचे प्रयत्न झाले. पण, ऐनवेळी शिवसेनेनं आमचे फोन घेणे बंद केले असं देशपांडे यांनी सांगितलं.
दूध पिल्यानंतर जीभ पोळते त्यावेळी आपण ताकही फुंकून पितो ही मराठी म्हण सांगत देशपांडे म्हणाले, आमची जीभ 2014 आणि 2017 मध्ये इतकी भाजली आहे. लोकांचीही भाजताना आम्ही बघितली आहे. तुमच्यावर विश्वास ठेवायचा तर तो कोणत्या मुद्यावर ठेवायचा? तुमच्यावर विश्वास ठेवावा अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे? हा महत्त्वाचा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. मात्र युती करण्याचा अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील असं त्यांनी स्पष्ट केलं.
तुम्ही आम्हाला वाईट ठरवून आमच्यासोबत एकत्र येऊ शकत नाही. आम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना जेवायला बोलावलं हे चुकीचं केलं. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटलांकडं जाऊन चॉकलेट खातात ते बरोबर आहे का? असा टोला देशपांडे यांनी लगावला.