विशेष प्रतिनिधी
चोंडी :लवकरच धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद कायदा अस्तित्वात येणार आहे. यातील धर्मांतर बंदी कायदा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करायला हवा. तर लव्ह जिहाद विरोधी कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करावा, अशी मागणी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
पडळकर म्हणाले, लव्ह जिहादच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांत उघडकीस आल्या होत्या. त्यामुळे या संदर्भात कायदा करणे गरजेचे आहे.
चोंडी येथे सभामंडप मिळवण्यासाठी 10 हेलपाटे घातले पण निधी लवकर मिळाला नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी एका झटक्यात 700 कोटी रुपयांचा निधी चोंडीसाठी दिला. अहिल्यादेवी यांना 300 वर्षानंतर न्याय मिळाला, अशी कृतज्ञता व्यक्त करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, अहिल्यादेवी यांचे नाव भाषणात सांगणारे पण कृतीशून्य असलेले राजकारणी वेगळे आहेत. देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि राज्यभर अहिल्यादेवींची जयंती साजरी व्हायला लागली. आम्ही कायम आंदोलन करत होतो पण कोणी दखल घेत नव्हते. देशात होळकर घराण्यावर काही राजकारण्यांनी अन्याय केला. केवळ एका वर्षात या सरकारने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे केले. 1770 मध्ये अहिल्यादेवी यांनी काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर मोदीजींनी त्याच मंदिराचा जीर्णोद्धार केला. गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणाविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, मी आज काहीही मागणार नाही पण आरक्षणाचा विचार सर्वांच्या मनात आहे. ओबीसींचे गेलेले आरक्षण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिकवले. बाजी प्रभूप्रमाणे आम्ही सगळे प्रामाणिक आहोत. जे लढायचे ते समोरासमोर लढणारे आम्ही आहोत.
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, अहिल्यादेवी यांनी कोणत्या जातीसाठी नव्हे तर देशासाठी कार्य केले. पण इतिहासकारांनी त्यांचा इतिहास लिहिला नाही. यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर यांचा इतिहास लिहिला गेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची जबाबदारी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी घेतली, असा इतिहास यावेळी पडळकर यांनी सांगितला.