विशेष प्रतिनिधी
सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांनी नुकतीच श्रीकृष्णाची उपमा दिली, उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी म्हटले होते की संजय देखील जवळच आहे. संजय आंधळ्या धृतराष्ट्रासाेबत बसला हाेता. त्यामुळे संजय राऊत यांना उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत असं म्हणायचं होतं का? असा टोला माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे. ( Is Uddhav Thackeray Dhritarashtra Shahaji Bapus question to Sanjay Raut)
शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, संजय राऊत यांनी महाभारत पुन्हा एकदा वाचावे, महाभारतातील संजय हा श्रीकृष्णाजवळ बसलेला नव्हता, तर अंधळ्या धृतराष्ट्राजवळ बसलेला होता. त्यामुळे संजय राऊत यांना उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत असं म्हणायचं होतं का? असा टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी उद्धव म्हणजे श्रीकृष्ण असे वक्तव्य केले होते. तर त्यांच्यावर झालेल्या टीकेनंतर आज त्यांनी त्यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. उद्धव ठाकरे यांची श्रीकृष्णासोबत तुलना केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र मोदींना विष्णूचा अवतार म्हटलेलं बावनकुळेंना आणि त्यांच्या भक्तांना चालतं का, असा उलट सवाल राऊतांनी केला. त्यावरुनही शहाजी बापूंनी कोटी केली आहे. म्हणाले की, विष्णू आणि कृष्णाच्या अवतारांमध्ये संजय राऊत का गुतंत आहेत, हे मला कळत नाही. संजय राऊत हे ट्रम्प, मोदी, चीन, जपान यांच्यावर का बोलत आहेत? गेल्या दहा वर्षांत मोदींनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली, त्यामुळे शेअर भारतीय बाजार हा इतर देशांच्या तुलनेत सगळ्यात कमी कोसळला. मोदींवर टीका करून स्वतःला महत्त्व प्राप्त करून घेऊ नका, आधी वार्डात निवडून या, असा टोला शहाजीबापू यांनी संजय राऊत यांना लगावला.
कर्जमाफीच्या वक्तव्यावरुन राज्यात चर्चेत आलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची बाजू शहाजीबापूंनी घेतली आहे. ते म्हणाले की, कोकाटेंचा स्वभाव खेळकर आहे. ते त्यांच्या मित्रांसोबत खेळकर स्वभावाने बोलत होते. त्यांच्या अंतकरणातला तो संवाद नव्हता, असे म्हणत आमदार शहाजीबापू पाटील यांनी कोकाटेंच्या वक्तव्यावर पांघरुन टाकण्याचा प्रयत्न केला.