विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार असे का वागतात? याबद्दल आम्हाला ही कधी कधी राग येतो. पण त्यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खासदार संजय राऊत यांना चांगलेच फटकारले आहे. प्रामाणिकपणाने सांगतो शब्द जरा जपून वापरा, हे विश्वासघातकी वगैरे आम्ही ऐकून घेणार नाही. पण जेव्हा लढायची वेळ येईल त्यावेळी तुमच्यापेक्षा जास्त आक्रमक शरद पवार साहेब असतील, असा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटात वाद सुरु झाला आहे. शरद पवार यांच्या हस्ते शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केल्यामुळे उद्धव ठाकरे गटाचा संताप झाला. यामुळे संजय राऊत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली.
यावर उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, म्हणाले, पवार साहेबांची उंची, महाराष्ट्रातील देशातील त्यांचे राजकारणातील स्थान अतुलनीय आहे. शरद पवार या देशात असे राजकारणी आहेत की त्यांच्या मनात सूड, द्वेष कधीच निर्माण होत नाही. ज्या माणसाने पवार साहेबांना राजकारणात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पक्ष, निशाणी पळवली सर्व केले पण त्यांच्यासोबत स्टेज शेअर करताना त्यांच्या मनात आक्रोश आणि चिड दिसत नाही. हे खरं तर महाराष्ट्रातील राजकारण्यांनी शिकण्यासारखं आहे. राजकीय संवाद वाढायलाच हवे. मात्र ते वाढत नाही हे दुर्दैव, तुम्ही तर विरोधकांची चटणीच करायला घेतली आहे.
खोट्या पोलीस केस करुन टाक आता, खोटे गुन्हे करुन टाक आता, त्यांचे राजकीय आयुष्य बरबाद करण्यासाठी काम कर, निधी बंद करुन टाक हे जे सुरु झाले ते पवार साहेबांना स्पर्श सुद्धा करत नाही. यामुळे पवार साहेब कुठल्या व्यासपीठावर जातात त्याचा कोणी विचारही करू नये, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
आपण सर्व एकमेकांना भेटत असतो. एकनाथ शिंदे मला अपॉइंटमेंट देत नाही ती गोष्ट वेगळी. अजित पवार मला केबिनमध्येच घेणार नाही. हे मला माहीत आहे. एकनाथ शिंदे भेटल्यावर एकच सांगतात की परवा भेटू, पण त्यांचा परवा कधीच येत नाही, हे अडीच तीन वर्षात मी पाहिले आहे, अशी खंतही आव्हाड यांनी व्यक्त केली.