विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळ आवारात समर्थकांनी हाणामारी करून घातलेल्या गोंधळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही सभागृहात खेद व्यक्त करण्याची शिक्षा सुनावली आहे. दोघांनी दोन्ही सभागृहात दिलगिरीही व्यक्त केली. (Jitendra Awhad Gopichand Padalkar sentenced to express regret in both houses)
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला आहे. गुरुवारी (17 जुलै) झालेले भांडण हे अतिशय गंभीर आहे. सर्जेराव टकलेने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मावस भाऊ असल्याचे सांगितले. नितीन देशमुख यांनी जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले या दोघांचे वर्तन सभागृहाची प्रतिष्ठा मलिन करणारी आहे. तसेच एकप्रकारे सभागृहाचा विशेषाधिकार भंग आणि अवमान केला आहे. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात खेद व्यक्त करावा.
नार्वेकर म्हणाले की, “विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यांना तात्काळ या घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले, त्या अनुषंगाने मला या घटनेबाबत विधानमंडळाच्या सुरक्षा विभागाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला. त्यानुसार, 17 जुलै 2025 रोजी झालेल्या दोन अभ्यंगतांमध्ये हाणामारी झाली. ही हाणामारी सुरक्षा पथकाने तात्काळ थांबवली. तसेच, सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. याबाबत संबधित व्यक्तींसोबतचा 6 ते 7 अनोळखी इसमांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दकही करण्यात आला आहे. त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.” अशी माहिती त्यांनी दिली.
कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना आणि अधिकृत प्रवेशिका नसताना अनधिकृतपणे हे अभ्यागत विधानभवनाच्या आवारात आले. त्यांनी मारामारी करुन आक्षेपार्ह कृत्य केल्याच दिसून येते. विधानमंडळाच्या परिसरात अशी घटना यापूर्वी कधीही झालेली नाही. सदस्यांनी विधानमंडळात येताना कोणत्याही अनाहूत व्यक्ती आणि अभ्यंगत यांना विधिमंडळाच्या परिसरात आणण्याची कोणतीही आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. तसेच अभ्यांगत कोणत्याही कारणामुळे विधानभवनात आले तर त्यांच्या वर्तणुकीची जबाबदारी संबंधित सदस्याने घेणे आवश्यक आहे. कोणत्याही अभ्यांगताच्या आक्षेपार्ह वर्तणुकीसाठी सदस्यांवर जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.” अशी समज त्यांनी यावेळी सर्व सदस्यांना दिली आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले की, “सदर अप्रिय घटनेबाबत मी सर्व सदस्यांच्या निदर्शनास आणत आहे की, विधिमंडळाचे सदस्य म्हणून आपले कर्तव्य पार पडत असताना आपणावर विधिमंडळाच्या सर्वोच्च परंपरा राखण्याचे उत्तरदायित्त्व आणि जबाबदारी आहे. विधिमंडळाला लोकशाहीचे मंदिर संबोधले जाते. त्यामुळे, दोन्ही सदस्यांनी सभागृहात खेद व्यक्त कराव्या,” अशा सूचना दिल्या. विधानभवन परिसरात यापुढे इतर कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही. यापुढे मंत्री, आमदार, शासकीय कर्मचारी वगळता कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही. त्याशिवाय, मंत्र्यांना त्यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नांची चर्चा, त्यांची सोडवणूक करण्यासाठी मंत्रालयातील दालनाचा वापर करावा,” अशी सूचना विधानसभा अध्यक्षांनी यावेळी दिली.