विशेष प्रतिनिधी
कोलकाता: तृणमूल कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असून खासदार कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेतील मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांना आपल्यावर सर्व खापर फोडण्यात आल्याचा आरोप केला आहे. पक्षातील समन्वय ठेवण्यात अपयशी ठरल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा दिला आहे.
( Mamata Banerjees Trinamool Congress on fire Kalyan Banerjee resigns from post)
बॅनर्जी यांचा हा निर्णय पक्षप्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका वर्च्युअल बैठकीनंतर काही तासांतच जाहीर करण्यात आला. या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी संसदीय पातळीवरील TMC च्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
माध्यमांशी बोलताना कल्याण बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं की, ” मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खासदारांमध्ये समन्वय नसल्याचं म्हटलं आहे. त्याचा सर्व दोष माझ्यावर होता. त्यामुळे मी लोकसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
जे लोकसभेच्या कामकाजात नियमित सहभागी होत नाहीत, पक्षात अशा सदस्यांना जबाबदार धरले जात नाही. उलटपक्षी, काम करणाऱ्या व्यक्तींना दोषी ठरवलं जात आहे. त्यांनी उदाहरणादाखल दक्षिण कोलकाता, बैरकपूर, बांकुडा आणि उत्तर कोलकाताचे खासदार सभागृहात दिसतच नसल्याचे सांगितलं.
जे खासदार ममता बॅनर्जी यांनी निवडून दिले, ते लोकसभेत येतच नाहीत. मी तरी काय करणार? माझी काय चूक आहे? सर्व दोष माझ्यावर टाकण्यात येत आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
कल्याण बॅनर्जी यांच्या मते, पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला असून, त्यांच्यावर केलेल्या अपमानासंदर्भात संबंधित सहकाऱ्यावर कोणतीही कारवाई न करता, उलटपक्षी त्यांनाच बळीचा बकरा बनवण्यात आलं आहे.त्यांच्या बोलण्याचा रोख कृष्णानगरच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याकडे होता, कारण त्यांच्यात अनेक वेळा मतभेद झाले होते.
महुआ मोइत्रा यांच्याशी झालेला अलीकडील वाद, तसेच माजी क्रिकेटपटू आणि सध्या खासदार असलेल्या कीर्ती आझाद यांच्याशी याआधी झालेल्या उघड वादामुळे पक्षाला अडचणींचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर TMC नेतृत्वाने संसदेत फ्लोअर मॅनेजमेंटची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
“ममता बॅनर्जी म्हणतायेत की खासदारामंध्ये वादविवाद होत आहेत. पण जी व्यक्ती मला शिवीगाळ करते, ते मी कसं सहन करायचं? मी पक्षाला याची कल्पना दिली होती. पण माझा अपमान करणाऱ्यांवर काही न करता, माझ्यावरच दोष टाकण्यात आला. ममता बॅनर्जी यांना योग्य वाटेल त्या मार्गाने पक्ष चालवावा, अशी प्रतिक्रिया बॅनर्जी यांनी दिली.