विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाला पूर्णविराम देत अखेर अधिकृत मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश झाला आहे. दरवर्षी उशिराने येणाऱ्या मान्सूनने यंदा मात्र सर्वांना आश्चर्यचकित करत तब्बल १२ दिवस आधीच राज्यात हजेरी लावली आहे. हवामान विभागाने रविवारी ही माहिती दिली. ( Monsoon arrives 12 days early in Maharashtra relief for farmers and citizens)
सामान्यतः ७ जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो, मात्र यंदा मान्सूनने आपली गती वाढवत आधीच अंदमान-निकोबार बेटांवर, त्यानंतर केरळमध्ये आणि आता महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालं असून, लवकरच मान्सून मुंबईतही दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागानुसार, यंदा संपूर्ण देशभर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. देशात १०७ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, ज्याचा थेट फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे. खरिप हंगामासाठी पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, मागील दोन-तीन महिन्यांपासून उकाड्याने त्रस्त नागरिकांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पुढील दोन-तीन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नांदेड, लातूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून मुंबई व ठाण्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.