विशेष प्रतिनिधी
सोलापूर : आज 10 वर्षानंतर अशी काय घटना घडली की गडाचे दरवाजे राजकारणासाठी उघडे झाले असा सवाल करत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी राजकारणात आले आहात तर काही वेळा स्तुती आणि कांही वेळा टिकाही होईल. या दोन्हीची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे, असा इशारा दिला आहे.
बीड जिल्हयातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात टीका होत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची नुकतीच भेट घेतली. त्यावर बोलताना महाजन म्हणाले,नामदेव शास्त्री यांचा ज्ञानेश्वरीवर गाढा अभ्यास आहे, स्वतःला न्यायाचार्य पदवी लावतात. त्यांनी कोणाला पाठिंबा द्यावा आणि कोणाचं समर्थन कराव हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे..त्यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा देण हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आता राजकारणात आले आहात तर काही वेळा स्तुती आणि कांही वेळा टिकाही होईल. या दोन्हीची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे,
महाजन म्हणाले, पंकजा मुंडेनी गडावरून राजकारण करायचं नाही म्हणून 2015 ला गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा खंडित केली. आज 10 वर्षानंतर अशी काय घटना घडली की गडाचे दरवाजे राजकारणासाठी उघडे झाले.2015 ला पंकजाला दसरा मेळावा गडाच्या पायथ्याशी घ्यावा लागला, 2016 ला भगवान बाबांच्या जन्मगावी मेळावा घेतला आणि ती परंपरा चालू राहिली. या सर्व गोष्टींचा मी साक्षीदार आहे.
पंकजा मुंडे यांचे समर्थन करताना महाजन म्हणाले,
ज्या भगवान गडाने पंकजाला एकटे सोडले त्याच भगवान बाबांच्या लाखो शिष्यांनी तिला तळहातावर उचलून घेतलं. कारण भगवान बाबांचा खरा आशीर्वाद तिच्या पाठीशी होता. आज महंत आव्हान करतायत त्यात कांही वावग नाहीये. त्यांनी कराव. मात्र पंकजा ही केवळ महिला आणि अबला होती म्हणून तुम्ही तिला न्याय नाकारला का?मेळावा करण्याचा अधिकार नाकारला का..? तुम्ही न्यायाचारी आहात तर तुमच्यासमोर न्याय करताना हा भेदभाव का आहे.
-ज्या ज्ञानेश्वरीमुळे तुम्हाला डॉक्टरेट मिळाली,त्या संत ज्ञानेश्वरांच आपली बहीण मुक्ताबाई विषयी काय वागणं होत हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं असत तर तुम्ही पंकजाला नाकारलं नसते.
धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, या दुहेरी मापदंडाचे आपल्याकडे काय उत्तर आहे?
असं काय मोठं दिव्य केलं की धनंजय मुंडे हे निष्पाप आणि निरपराध आहेत असं सर्टिफिकेट दिले. मी धनंजय मुंडेच्या मीडिया ट्रायलच्या विरोधात आहे. महाराष्ट्रात साधूसंत राजकारणात आले तर त्यानिमित्ताने चांगले माणसं येतील आणि वाईट माणसं दूर होतील. नायतर कसा भस्मासुर परळीत झाला आणि त्याने कसा बीड जिल्हा खाल्ला हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय.या भस्मासुराचा जन्मदाता कोण आणि त्याला या पापापासून सुटका आहे का..? त्याला पोसलं आणि वाढवलं कोणी ,? त्याच्या तोंडाला रक्त कोणी लावल,हे आपत्य कोणाचं आहे, याची जबाबदारी कोण घेणार? याची उत्तर महंत देणार आहेत का..?सत्तेच्या सिंहासनावर साधूत्व जरी आरूढ झालं तरी पिस गळतात ती साधूत्वाची..आता त्यांनी राजकारणात पाऊल टाकलं आहे. लगेच पिस गळतील.