विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानने शनिवारी संध्याकाळी युद्धविरामावर सहमती दर्शवली होती, मात्र अवघ्या काही तासांत पाकिस्तानने युद्धविरामाचे उल्लंघन करत पुन्हा एकदा ड्रोन हल्ले आणि गोळीबार सुरू केला. या घडामोडींनंतर संपूर्ण सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेत पाकिस्तानकडून झालेल्या या घुसखोरीचा तीव्र निषेध केला आणि भारतीय लष्कर अशा प्रत्येक उल्लंघनाला ठोस आणि योग्य प्रत्युत्तर देईल, असा इशारा दिला.
( Pakistan violates ceasefireIndia prepares strong response)
शनिवारी सकाळी भारतीय वायूदलाने पाकिस्तानातील आठ लष्करी तळांवर अचूक हल्ले केले. यामध्ये रडार युनिट्स आणि दारूगोळ्याचे साठे उद्ध्वस्त करण्यात आले. हे हल्ले पाकिस्तानकडून भारतीय लष्करी तळांवर आणि नागरी ठिकाणांवर झालेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात करण्यात आले. विशेष म्हणजे, शनिवारी पहाटे जम्मू, श्रीनगर, उधमपूर यांसारख्या शहरांमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले.
युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून उधमपूर, कच्छ, पंजाब आणि राजस्थानमध्ये ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. या ठिकाणी एअर रेड सायरन्स वाजवले गेले, नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आणि ब्लॅक आऊट करण्यात आला. जम्मू, पतियाळा आणि बारमेरमध्ये पूर्ण ब्लॅक आऊट करण्यात आला आहे. राजौरीमध्ये झालेल्या गोळीबारात अतिरिक्त जिल्हा विकास अधिकारी राजकुमार थापा यांचा मृत्यू झाला असून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा करत ही वाटाघाटी अमेरिकेच्या मध्यस्थीने झाली असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयाला पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मान्यता दिली. भारताने मात्र स्पष्ट केले की सिंधू पाण्याचा करार तात्पुरता स्थगित ठेवण्यात येईल आणि पाकिस्तान नागरिकांसाठी व्हिसा बंदीही कायम राहील.
नागरिक उड्डाण मंत्रालयाने ३२ विमानतळांवरील नागरी उड्डाणे १५ मे सकाळी ५:२९ पर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली असून, दिल्ली आणि मुंबई एअर ट्रॅफिक क्षेत्रांतील २५ मार्गही तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर प्रखर हल्ले करून किमान १०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. आता पाकिस्तानकडून पुन्हा युद्धविरामाचे उल्लंघन झाल्याने, भारताकडून कठोर आणि ठोस उत्तर देण्याची तयारी करण्यात आली आहे.