विशेष प्रतिनिधी
श्रीनगर: काश्मीरच्या मशिदींमध्येही दहशतवादाविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे काश्मीरमधील दहशतवादाच्या अंताची सुरुवात आहे, असा विश्वास जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्रीओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.
( Protest against terrorism in mosques too The beginning of the end of terrorism in Kashmir)
विशेष अधिवेशनात बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने आम्हाला पोखरुन काढले आहे. खूप अवघड आहे यातून मार्ग काढणे. मात्र या हल्ल्यानंतर मागील 26 वर्षात मी पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमधील लोकांना असे बाहेर पडताना कधी पाहिले नाही. कठुआपासून सर्वत्र लोकांनी बाहेर पडत या हल्ल्याचा निषेध केला. लोकांचे अशाप्रकारे बाहेर पडणे यामध्ये आपल्या कोणाचाच हात नाही. आम्ही मृत्युमुखी पडलेल्या लोकांसोबत आहोत, हे दाखवण्यासाठी लोकांनी मेणबत्ती पेटवली. काश्मीरच्या मशिदींमध्येही दहशतवादाविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आपण आता असे काहीही बोलू नये किंवा दाखवू नये, ज्यामुळे या चळवळीला हानी पोहोचेल, अशी विनंती करत ओमर अब्दुल्ला म्हणाले की, जेव्हा लोक आपल्याला पाठिंबा देतील तेव्हाच दहशतवाद संपेल. जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या विरोधामुळे सध्या असे दिसते की, ते या मार्गावर आहेत.
अब्दुल्ला म्हणाले की, पोलीस नियंत्रण कक्षात त्यादिवशी मी विरोधकांसोबत दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या 26 जणांना श्रद्धांजली वाहिली. पण पर्यटनमंत्री म्हणून पर्यटकांना सुरक्षित पाठवणे हे माझे कर्तव्य होते आणि ते मी पार पाडू शकलो नाही. त्यामुळे त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांची माफी मागू? यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते. “त्या छोट्या मुलांनी आपल्या आई-वडिलांना मरताना पाहिले किंवा त्या नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीला ज्यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते,” त्यांना मी काय बोलणार होतो. असे म्हणत अब्दुल्ला यांनी दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आपली हळहळ व्यक्त केली.
अब्दुल्ला म्हणाले की, हा काश्मीरमध्ये झालेला पहिला हल्ला नाही. आम्ही आजपर्यंत अनेक हल्ले पाहिले आहेत. अमरनाथचा हल्ला, टोडा, काश्मीरी पंडितांच्या वस्त्यांवर झालेले हल्ले पाहिले आहे. मात्र मागच्या काही वर्षानंतर पहलगाममध्ये झालेला हल्ला हा सर्वात मोठा आहे. पहलगामच्या बैसरणमध्ये 21 वर्षांनंतर पुन्हा एकदा तशीच स्थिती निर्माण झाली. यानंतर आता पुढचा हल्ला कुठे होईल, हे माहित नाही.