विशेष प्रतिनिधी
नागपूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी अति डाव्या विचारसरणीच्या लोकांनी घेरलेले आहेत.त्यामुळे ते अति डाव्या विचारसरणीने ग्रस्त झाले असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ( Rahul Gandhi suffers from extreme left-wing ideology alleges Chief Minister Devendra Fadnavis)
महाराष्ट्र सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या जन सुरक्षा विधेयकाला आता काँग्रेस विरोध करत आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, जन सुरक्षा विधेयक तयार करण्यात आल्यानंतर त्यातील प्रत्येक मुद्द्यावर संयुक्त चिकित्सा समितीच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसला देखील या विधेयकावर कोणताही आक्षेप नव्हता. त्यानंतरच हे विधेयक विधिमंडळात मंजूर करण्यात आले आहे. मात्र आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आदेश दिल्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांपुढे कोणताच पर्याय राहिला नाही. त्यामुळे ते आता या जन सुरक्षा विधेयक विरोधात आंदोलन करत आहेत. त्यामुळे ते अति डाव्या विचारसरणीने ग्रस्त झाले असल्याची टीका देखील फडणवीस यांनी केली आहे.
एक रुपयात पिक विमा योजना बंद करण्यात आली असून या संदर्भात स्पष्टिकरण देताना कोकाटे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या आधी वाद झाला त्या वेळी मी शेतकऱ्यांना भिकारी म्हणालो नव्हतो तर शेतकऱ्यांकडून एक रुपया घेणारे शासनच भिकारी असल्याचे म्हटले होते, असे कोकाटे यांनी म्हटले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा कृषि मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे काय बोलले हे मी ऐकलेले नाही. मात्र, जर त्यांनी असे वक्तव्य केले असेल तर ते अतिशय चुकीचे आहे. पिक विमा संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली . एक रुपयात पिक विमा योजनेत काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला असला तरी त्याचा जास्तीचा फायदा कंपन्या घेत असल्याचे लक्षात आले. म्हणूनच याची पद्धती बदलली. मात्र त्याच बरोबर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पाच हजार कोटी रुपये दर वर्षी शेतीत गुंतवणूक करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्याचीही सुरुवात या वर्षीपासून करणार आहे.