विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपुरम : कम्युनिस्ट पक्षाकडून हिंसेच्या उदात्तीकरणाचा प्रकार समोर आला आहे .भाजप खासदार आणि आरएसएस नेते सदानंदन मास्टर यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या(सीपीआय(एम)) आठ कार्यकर्त्यांना शिक्षा भोगण्यासाठी जेलमध्ये जाण्यापूर्वी जल्लोषात निरोप देण्यात आला. या निरोप सोहळ्याला माजी आरोग्यमंत्री आणि मत्तनूरच्या आमदार के. के. शैलजा यांचीही उपस्थिती होती. ( Red salute to criminals from communists BJP MP Sadanandan Masters leg amputee bids farewell in celebration before going to jail)
हा निरोप सोहळा थलसेरी सत्र न्यायालयासमोर आणि नंतर मत्तनूरमध्ये झाला. पक्षाच्या घोषणाबाजी, पुष्पहार, कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि ‘लाल सलाम’ या वातावरणात गुन्हेगारांचा गौरव केला गेला, हे दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे.
२५ जानेवारी १९९४ रोजी, तेव्हा फक्त ३० वर्षांचे असलेले शिक्षक आणि आरएसएसचे सहकार्यवाह सदानंदन मास्टर यांच्यावर योजनाबद्धरित्या प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात त्यांचे दोन्ही पाय कापले गेले. त्यांच्यावर आयुष्यभरासाठी व्हीलचेअरवर रहावे लागले.
या प्रकरणात १२ आरोपींवर खटला चालवण्यात आला होता, पण १९९७ मध्ये आठ जणांना दोषी ठरवण्यात आले आणि चार जण निर्दोष सुटले. सुरुवातीला त्यांच्यावर TADA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, पण नंतर ती कलम मागे घेण्यात आली. या आठ दोषींना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, पण गेली तीन दशके ते जामिनावर मुक्त होते. 2025 मध्ये केरळ उच्च न्यायालयाने त्यांचा दोष कायम ठेवला आणि स्पष्टपणे सांगितले की,हा हल्ला क्षणिक संतापातून नव्हता, तर पूर्वनियोजित आणि अत्यंत निषेधार्ह होता. दोषींना कोणतीही सूट देण्यासारखी परिस्थिती नाही.”
कोर्टाने प्रत्येक आरोपीला पीडितास ₹५०,००० नुकसानभरपाई देण्याचे आदेशही दिले. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची अंतिम याचिका फेटाळली. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने जामिन रद्द करून ४ ऑगस्टपूर्वी शरण जाण्याचा आदेश दिला.
या गुन्हेगारांनी कोर्टात शरण जाण्याआधी शांततेने आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित असताना, सीपीआय(एम) ने त्याचा राजकीय तमाशा केला. कार्यकर्त्यांना ‘शहीद’सारखा निरोप देत पक्षाने राजकीय हिंसाचाराचे उघडपणे उदात्तीकरण केल्याचा आरोप होत आहे.
सदानंदन मास्टर यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. न्यायालयांनी दोष निश्चित केला असूनही त्यांचे सत्कार करून समाजात चुकीचा संदेश दिला जात आहे. केवळ पार्टी कार्यकर्ते म्हणून गुन्हेगारांचा गौरव होतो आहे. ही राजकारणाची अधोगती आहे.”
भाजप, काँग्रेससह अनेक पक्षांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला असून, हिंसक राजकारणाचे उदात्तीकरण करणाऱ्या पक्षांविरोधात जनतेने जागरूक राहावे, अशी मागणी केली आहे.