विशेष प्रतिनिधी
मुंबई : औरंगजेबाची कबर राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नाही. त्यातून पुढच्या पिढीला वारसा किंवा शिकवण घेण्यासारखं काही नाही. केंद्रीय पुरातत्व विभागाला ऐतिहासिक वास्तुंच्या यादीतून औरंगझेबाची कबर हटवण्याचे निर्देश द्या, अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
( Remove Aurangzeb’s tomb, ban Chhava Movie, petition in the High Court)
आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केली आहे. औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नाही.त्यातून पुढच्या पिढीला वारसा किंवा शिकवण घेण्यासारखं काहीही नाही असं केतन तिरोडकर यांनी याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे केंद्रिय पुरातत्व विभागाला ऐतिहासिक वास्तूंच्या यादीतून औरंगजेबाची कबर हटवण्याचे निर्देश देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. याबाबत लवकरच सुनावणी अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
कबर पुरातत्व विभागाच्या यादीतून वगळली की राज्य सरकारनं ती तिथून कायमची हटवून टाकावी, अशी मागणी याचिकेमधून करण्यात आली आहे. कबर हटवावी जेणेकरून भविष्यात पुन्हा यावरून जातीय तेढ निर्माण होणार नाही, असेही याचिकेत म्हटलं गेलं आहे. याशिवाय छावा सिनेमाच्या प्रदर्शनावर तूर्तास बंदी घालण्याबाबतही राज्य सरकारनं विचार करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. तसंच 17 मार्च रोजी औरंगजेबाची कबर उखडण्याच्या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये दंगलही उसळली होती. त्यानंतर औरंगजेबाची कबर झाकून ठेवण्यात आली आहे. नागपूरसह मराठवाड्यातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एनआयए दिल्लीचे एक पथक छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहे. परभणी, जालना, नांदेड या ठिकाणीदेखील पथक गेले असून तेथील संशयित हालचालींवर लक्ष आहे.
औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा आता राज्यसभेत पोहचला असून, खासदार संजय राऊत यांनी हात मुद्दा आज राज्यसभेत उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले, मणिपूरनंतर महाराष्ट्र जळत आहे, नागपूरमध्येही दंगली होत आहेत. गृह मंत्रालयाने गेल्या काही वर्षांत देशाला पोलीस स्टेट बनवले आहे. याचबरोबर संजय राऊत यांनी केंद्र सरकारला औरंगजेबची कबर तोडण्याचे आव्हान दिले व औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी तुमच्या परदेशात शिकत असलेल्या मुलांना पाठवा असेही म्हटले. दरम्यान संजय राऊत यांच्या या भाषणावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील सभागृहात उपस्थित होते.