विशेष प्रतिनिधी
सातारा: रायगड, नाशिकप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती द्यावी, आंदोलनाची वेळ आणू नये, असा इशारा सातारा जिल्हा बँकेच्या संचालिका आणि शिवेंद्रराजे भोसले समर्थक कांचन साळुंखे यांनी दिला आहे.
(Controversy over the post of Satara Guardian Minister, Shivendraraje Bhosle’s supporters are aggressive)
पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीवरून रायगड, नाशिकनंतर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही राजकीय घमासान सुरू झालंय. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना साताऱ्याचं पालकमंत्रिपद न मिळाल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. रायगड, नाशिकप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती द्यावी, आंदोलनाची वेळ आणू नये, असा इशारा सातारा जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांनी दिला आहे. साताऱ्याचे पालकमंत्री पद शिंदे गटाचे शंभुराजे देसाई यांना मिळाले आहे.
साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेत. त्यांना साताऱ्याचं पालकमंत्रिपद देऊन राजधानीचा सन्मान करावा, अशी मागणी कांचन साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केली. दिवंगत अभयसिंहराजे भोसले, विलासकाका उंडाळकर, दिलीप वळसे-पाटील, अजित पवार यांनी आपल्या कामाचा राज्यात ठसा उमटवला. त्यांनी दबावतंत्राचा अन् पदाचा गैरवापर केला नव्हता. त्यांच्याच विचाराचा पालकमंत्री व्हावा, अशी आमची मागणी असल्याचं कांचन साळुंखे यांनी सांगितलंय.
सातारा जिल्ह्यात भाजपाचं वर्चस्व असूनही पालकमंत्रिपद न मिळाल्यानं शोककळा पसरलीय. पालकमंत्रिपदासाठी कोणते निकष लावले गेले हे स्पष्ट करण्याची मागणीही कांचन साळुंखे यांनी केलीय. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करून सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री बदलावा अन्यथा आम्हाला उपोषण करावं लागेल, असा इशाराही त्यांनी दिलाय.