विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ पाकिस्तानात जा, त्यांना आसरा देणाऱ्या सापांना बिळातून ओढून बाहेर काढू. ही लढाई आरपारची आहे, देशभक्तीची लढाई आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आमचा शिवसैनिक देशाच्या जवानासारखा लढल्याशिवाय राहणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
( Shiv Sainik will fight like a soldier for the security of the country Eknath Shinde said)
बुलढाण्यातील सभेत बाेलताना शिंदे म्हणाले, देशावर झालेला भ्याड हल्ला निषेधार्ह आहेच. पण आता ही लढाई आरपारची आहे, त्यामुळे आमचा शिवसैनिक जवानांसारखा लढल्याशिवाय राहणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक जिथे असतील तिथून त्यांनी ताबडतोब पाकिस्तानात चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला जागेवरच ठोकतील.
पहलगामध्ये झालेला हल्ला हा देशाच्या शत्रूने भारताच्या आत्म्यावर केलेला हल्ला आहे. पाकिस्तानचे कायमचे कंबरडे मोडून नामोनिशाण मिटवले पाहिजे, ही समस्त भारतीयांची भावना आहे. जो आमच्यावर हल्ला करेल तो संपून जाईल, आता पाकिस्तानला संपवायची वेळ आलीय. केंद्र सरकार काम करतंय, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करायला सुरुवात झालीय. “हा शेवटचा हल्ला असेल यापुढे हल्ला करण्याचे धाडस त्यांच्यात उरणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
हा घरात घुसुन हल्ला करणारा भारत आहे, व्होट बँक आणि मतांच्या लाचारीसाठी शेपूट घालणारा भारत नाही. सर्वजण भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहेत. जेव्हा आपत्ती येते तेव्हा शिवसैनिक म्हणून सगळी टीम घेऊन तेथे मदतीसाठी धावून जातो. ज्या दिवशी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, त्याच दिवशी रात्री खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची टीम श्रीनगरला पोहोचली होती. तेथे थांबलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी संपर्क साधून दिला. यात कोणी पती गमावला, तर कोणी भाऊ गमावला होता, कोणी कुटुंबातील सदस्य गमावला होता. या निरपराध पर्यटकांच्या मानसिक अवस्थेची मला जाणीव झाली. त्यांना मानसिक आधार आवश्यक होता. लवकरात लवकर घरी परतायचं अशी त्यांची भावना होती. यातूनच ४५० पर्यटकांना आपण परत आणले. तसेच बुलढाण्यातील ५१ पर्यटकही सुखरुप घरी पोहोचले, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.