विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना ठाकरे गट आपला दावा असे म्हणणार नाही पण आपला हक्क सांगणार आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले आहे .( Shiv Sena’s Thackeray group has right on the post of Leader of Opposition)
विधानसभेत कोणत्याही पक्षाला एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत. आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. यात भाजपाला 132 जागा, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीला एकूण 46 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 16, शिवसेनेला (उबाठा) 20 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार) 10 जागा जिंकता आल्या आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. कोणत्याही पक्षाकडं विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान 29 आमदार असले पाहिजेत. पण, महाविकास आघाडीत कोणत्याही पक्षाचे 29 आमदार विजयी झालेले नाहीत. काँग्रेसपासून शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पर्यंत कोणत्याही पक्षाला 20 पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांच्या आणि अन्य लहान घटक पक्षांच्या मिळून 46 जागा मिळाल्या. पण एकाही पक्षाला 29 जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद मिळणार की नाही ही शंका असताना या पदावरून महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.
संजय राऊत यावर म्हणाले, आमदारांची संख्या जरी कमी असली तरी नियमांत आणि घटनेत असे कुठेही म्हटले नाही की, विरोधी पक्षनेत्याशिवाय विधानसभा चालावी. शिवसेनेचे 20 चे बळ आहे. याआधी यापेक्षा कमी संख्या असतानाही विरोधी पक्षनेते पद मिळालेले आहे. आमची एकत्रित संख्या 50 च्या वर आहे. त्यामुळे सरकारने खासकरून विधानसभा अध्यक्षांनी त्यांना घटना, संविधान, लोकशाही याविषयी नक्कीच जाण असावी आणि असायला पाहिजे आणि ते या विधानसभेत आमची विरोधी पक्षनेतेपदाची जी भूमिका आहे, ती मान्य करतील.