विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी २६ निष्पाप पर्यटकांच्या जिवावर उठलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानने आता चक्क भारताला “संपूर्ण लष्करी ताकदीनं उत्तर देऊ” अशी धमकी दिली आहे. ( Terrorist Pakistans threats continue Army Chief vows to respond with full military might)
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी रावळपिंडी येथील कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, “पाकिस्तान शांतता राखू इच्छितो, मात्र जर आमच्या सार्वभौमत्वावर गदा आली, तर आम्ही संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ.”
भारत कठोर पाऊल उचलणार या धास्तीने पाकिस्तानमध्ये घबराट पसरली असताना लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी ही वल्गना केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी भारताला इशारा दिला आहे. रावळपिंडी येथील जनरल मुख्यालयात झालेल्या १५व्या नॅशनल वर्कशॉप बलुचिस्तानच्या सहभागींशी संवाद साधताना जनरल मुनीर यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले की, “पाकिस्तान शांतता राखू इच्छितो, पण जर आमच्या सन्मानाला धोका निर्माण झाला तर कोणतीही कारवाई करण्यात आम्ही मागे-पुढे पाहणार नाही.”
या वक्तव्याच्या काही तासांपूर्वीच पाकिस्तान सरकारने दावा केला होता की, भारत लष्करी कारवाईसाठी तयारी करत आहे, अशी त्यांच्याकडे “विश्वसनीय गुप्त माहिती” आहे.
दरम्यान, बलुचिस्तानमधील अंतर्गत सुरक्षाविषयक परिस्थितीवरही जनरल मुनीर यांनी भाष्य केले. त्यांनी बलुच लोकांच्या नावावर दहशतवाद पसरवणाऱ्या टोळ्यांना देशद्रोही ठरवत त्या बलुच समाजाच्या अभिमानावर डाग असल्याचे म्हटले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने थेट पाकिस्तानवर सीमेपलीकडून दहशतवाद (क्रॉस बॉर्डर टेररिझम) चालवत असल्याचा आरोप केला आहे. यास उत्तर म्हणून भारताने सिंधू जलकरार निलंबित करणे, अटारी सीमारेषा बंद करणे, पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द करणे यासारखी कठोर पावले उचलली आहेत.
पाहलगाममधील हल्ला हा २०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात भीषण हल्ला मानला जात आहे. यात २६ निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले. भारत सरकारने लष्कराला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले असून, वेळ, स्थळ आणि पद्धत निवडण्याचे अधिकार सुरक्षा दलांना दिलेआहेत.