विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिवसेनेच्या पारंपरिक ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू असलेला वाद अजूनही मिटलेला नाही. ठाकरे गटाने पुन्हा एकदा या प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोन वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणाला गती मिळावी, यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाने न्यायालयात प्रकरण लवकर ‘बोर्डवर’ घ्यावे, अशी विनंती केली. ( Thackeray group moves Supreme Court hearing on bow and arrow symbol on July 16)
गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकरण न्यायालयाच्या यादीवरच येत नव्हते. त्यामुळे ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या माध्यमातून पुन्हा युक्तिवाद करत हे प्रकरण तातडीने सुनावणीस घेण्याची विनंती करण्यात आली. न्यायालयाने या मागणीवर विचार करत १६ जुलै २०२५ रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय चुकीचा होता. हा निर्णय घटनाविरोधी असून त्यामध्ये पक्षाच्या मूळ मूल्यांची व लोकशाही प्रक्रियेची पायमल्ली झाली आहे. त्यामुळे त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेल्या वर्षीपासून प्रलंबित असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधान परिषद आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिन्हाचा निर्णय लवकर होणे महत्त्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे मोठा राजकीय फटका बसल्याचे चित्र आहे.
संजय राऊत म्हणाले की, “हे केवळ चिन्हाचे प्रकरण नाही, तर शिवसेनेच्या अस्मितेचा, निष्ठेचा आणि खरी शिवसेना कुणाची याचा न्यायालयीन लढा आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
एकनाथ शिंदे गटाकडून मात्र यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र १६ जुलै रोजी या प्रकरणावर पुन्हा लक्ष लागले आहे.