विशेष प्रतिनिधी
मुंबई : वादग्रस्त विधाने करणारे महायुतीचे मंत्री नितेश राणे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. तसेच, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना तंबी दिल्याची चर्चा आहे. पण यावर स्वतः मंत्री नितेश राणे यांनी नकार दिला असून मी त्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीमधील एक असल्याचे सांगितले. (There was talk of the Chief Minister scolded Nitesh Rane, but he said that I am the beloved minister)
नितेश राणेंना मंगळवारी मुंबईतील विधिमंडळामध्ये असलेल्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना पुढील काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर नितेश राणे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. दरम्यान, मुंबईमध्ये राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून त्यामध्ये नीतेश राणे यांच्यासह अनेक आमदार तसेच नेते औरंगजेबाची कबरीवरून विधाने करत आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. वादग्रस्त विधाने करणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.
मंत्री नितेश राणे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, “तंबी दिल्याची बातमी तुम्ही चालवता. मी लाडक्या यादीमधला एक आहे. मुख्यमंत्र्यांची लाडक्या मंत्र्यांची यादी आहे, त्याच्यामध्ये नितेश राणेचे नाव आहे, त्याची तुम्ही चिंता करू नका. माझे मुख्यमंत्री मला काय बोलतात, याची चिंता करू नका. तुमच्या घरात मी डोकावतो का? माझ्या तोंडी कोणी लागू नये. मी दुसऱ्या मंत्र्यांसारखा नाही,” असे म्हणत त्यांनी उत्तर दिले आहे. तसेच नागपूरवरील घटनेवर ते म्हणाले की, “नागपूरमध्ये झालेला हिंसाचाराची घटना ही पूर्वनियोजित होती. समाज कंटकांनी पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ले केले आहेत. थेट पोलिसांवर हल्ला केल्यानंतर सरकार म्हणून आम्ही शांत राहणार का? पाकिस्तानमधील अब्बांची आठवण कराल, अशी कारवाई आता होणार आहे.” असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.