विशेष प्रतिनिधी
वैजापूर : लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात व्होट जिहादचा प्रयोग झाला. आध्यात्मिक शक्तीने या व्होट जिहादचा पराभव केला असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ( Vote Jihad in Maharashtra defeated by spiritual power Chief Minister Devendra Fadnavis exposes conspiracy)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे श्री संत सद्गुरू योगिराज गंगागिरीजी महाराज यांच्या 178 वा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, राष्ट्रीय विचारला पराजित करण्यासाठी काही लोक एकत्रित आली. हे षड्यंत्र लक्षात आले तेव्हा आम्ही महाराष्ट्रातील आध्यात्मिक शक्तीला आव्हान दिले. परमपूज्य रामगिरी महाराज आणि येथील सर्व संतांना सांगितले की हे राजकीय आक्रमण नाही, हे आक्रमण आपल्या संस्कृतीवर आहे. काही मूठभर लोक एकत्र येऊन संतांच्या विचारांना, राष्ट्राच्या विचारांना पराजित करू शकतात अशी भावना तयार झाली तर मागच्या काळात आमच्या मंदिरांवर आक्रमण झाले, संस्कृतीवर आक्रमण झाले तसे मूक आक्रमण पुन्हा पाहायला मिळेल. सरकार येतील, सरकार जातील कोणतीच खुर्ची कायम राहत नसते. पण, आपला देश आणि आपला धर्म कायम राहिला पाहिजे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले होते की स्वराज्य देव देश आणि धर्माकरता आहे. मी आध्यात्मिक शक्तीचे साष्टांग दंडवत घालत प्रणाम करतो.
आध्यात्मिक शक्तींनी उभ्या महाराष्ट्राला जागे केले आणि सांगितले की आपल्या संस्कृतीला वाचवायचे असेल तर जाती-भेद विसरून एकत्र यावे लागेल. जो विचार संतांनी दिला, प्रत्येक जण एकमेकांमध्ये पांडुरंग बघतो. आमचे रामगिरी महाराजांसह संत शक्ती जेव्हा मैदानात उतरली आणि तुम्ही परिणाम पाहिला. संत शक्ती जेव्हा मैदानात उतरते सगळ्यांचा सुपडा साफ होतो. त्याठिकाणी अभूतपूर्व असा विजय आम्हाला मिळाला. म्हणूनच मला या ठिकाणी येऊन जाहीरपणे या संत शक्तीचे आभार मानायचे होते.
मी जेव्हा मुंबईवरून विमानातून निघालो तेव्हा खाली समुद्र पाहताना विचार आला की किती मोठा हा समुद्र आहे. त्यावेळी आम्हाला कल्पना नव्हती की या ठिकाणी सप्ताहाला आल्यानंतर जनतेचा समुद्र पाहायला मिळतोय, ज्यावेळी खाली उतरलो त्यावेळी मी दाखवले की भाविकांचा अथांग समुद्र इथे आहे. आज रामगिरी महाराज अतिशय समर्थपणे गंगागिरी महाराजांची परंपरा चालवत आहेत. इथली शिस्त आणि भाविकता तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रसाद देताना जी तत्परता दिसते ही जगा वेगळे आहे.
रामगिरी महाराजांचे मुख्यमंत्री बंगल्यावर निमंत्रण द्यायला मला आवडलेच असते, पण मी त्यांना निरोप दिला की आधी मला तुमच्या दारी येऊ द्या, शनिदेवाचे दर्शन घेऊ द्या, तुमचे दर्शन घेऊ द्या आणि या सर्व भाविकांचे दर्शन घेऊ द्या. मग तुम्ही मुंबईला या.
आमचे गिरीश भाऊ असतील किंवा विखे पाटील असतील, आपल्या सरला बेटाचे जे काही कार्य आहे ते कार्य पुढे नेण्याचे कार्य करत आहेत. जे भाविक येतात त्यांच्या व्यवस्था करण्याचे काम केले जात आहे. त्यातच शनीदेवगाव बंधरा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे कल्याण होणार आहे. त्यामुळे मी आज वचन देतो हा शनीदेव गाव बंधारा होणार म्हणजे होणार. सरला बेटाचा जो काही विकास आराखडा 109 कोटींचा तयार झालेला आहे, त्याला आम्ही मंजूरी देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.