विशेष प्रतिनिधी
नागपूर : “वक्फ बोर्ड संदर्भात जर सखोल संशोधन झाले, तर देशभरातील गरीब, मागास आणि वंचित मुस्लिमांना त्याचा मोठा लाभ होऊ शकतो,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी आज येथे केले. ( Waqf Board Amendment Bill is in the interest of Muslimsbenefits poor Muslims says Minority Commission Chairman Pyare Khan)
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर आजपासून संसदेत चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षाने या सुधारणांना विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर प्यारे खान म्हणाले, “सरकार जर मुस्लिमांविषयी वाईट भावना ठेवत असती, तर वक्फ बोर्ड आज अस्तित्वातच राहिला नसता. उलटपक्षी, हे सरकार मागास आणि गरिब मुस्लिमांना त्यांचा हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी वक्फ बोर्ड संशोधन विधेयक सादर करत आहे.”
पूर्वीच्या सरकारांवर टीका करत प्यारे खान म्हणाले, “याआधी कुठल्याही सरकारने वक्फ बोर्डातील भ्रष्टाचारावर लक्ष दिले नाही, किंवा गरीब मुस्लिमांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी पावले उचलली नाहीत. विद्यमान सरकारने आता हे पाऊल उचलले आहे, त्याचे स्वागत व्हायला हवे. वक्फ बोर्डाकडे प्रचंड प्रमाणावर जमिनी आहेत. या जमिनी जर योग्य पद्धतीने वापरल्या गेल्या, तर सरकारला मुस्लिमांना वेगळी सवलत देण्याची गरजच भासणार नाही. त्या जमिनीवर गरीब मुस्लिमांचा हक्क आहे आणि त्याचा उपयोग त्यांच्यासाठी व्हायला हवा.”
काश्मीरचा दाखला देत ते म्हणाले, “कलम 370 हटवताना जे आरोप लावले गेले, तेच आरोप आता वक्फ बोर्ड संशोधन विधेयकावर लावले जात आहेत. पण आज काश्मीरचा विकास पहा. तिथले गरीब आणि मागास मुस्लिम देखील आज हक्काचे जीवन जगू शकत आहेत.”
प्यारे खान यांनी वक्फ बोर्डातील सध्याच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात मी स्वतः काम करतो. माझ्याकडे अनेक मुस्लिम बांधवांच्या तक्रारी येतात की वक्फ बोर्डात त्यांचे काम होत नाही. त्यांच्या हक्काच्या जमिनीवर देखील ते काही करू शकत नाहीत. म्हणूनच हे विधेयक अत्यंत आवश्यक आहे.
वक्फ बोर्ड संशोधन विधेयक हे कुठेही मुस्लिमांच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणारे नाही. उलट, हे विधेयक मुस्लिमांच्या हितासाठी आहे. त्यामुळे ज्यांना मुस्लिमांचा खरा विचार आहे, त्यांनी या विधेयकाचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन करताना प्यारे खान म्हणाले,आज जे विरोध करत आहेत, त्यांनी कधी वक्फ बोर्डात असलेल्या गैरव्यवस्थेविरोधात आवाज उठवला का? मग आता सरकार योग्य पावले उचलत आहे, तेव्हा विरोध का?”